अमोल जाधव यांचा अनाथ व वंचित मुलांसोबत असाही वाढदिवस साजरा 

तुळजापूर,दि.११: 

 मानवतेचे खरे सौंदर्य हे केवळ भाषणात नाही तर कृतीतून दिसून येते, याचा प्रत्यय तुळजापूर तालुका शिवसेना प्रमुख अमोल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आला. शिवसेनेचे ब्रीदवाक्य “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” याचा अर्थ प्रत्यक्षात उतरवत त्यांनी आपल्या खास दिवसाचा आनंद अनाथ व वंचित घटकातील मुलांसोबत साजरा केला.

अमोल जाधव यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप केले, तसेच तुळजापूर शहरातील अनाथ आश्रमात जाऊन मुलांसोबत वेळ घालवला. त्यांच्या उपस्थितीने मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली. काहींच्या डोळ्यांत चमक होती तर काहींना आनंदाश्रूही अनावर झाले.

या दिवशी मुलांसाठी खास पाच पक्वान्नांचा बेत करण्यात आला होता. गोड पदार्थ, पनीर मसाला, पापड, भाजी, भजी, चपाती, भात अशा रुचकर जेवणाचा सुगंध संपूर्ण आश्रमात दरवळत होता. अमोल जाधव यांनी स्वतः केक कापून मुलांबरोबर हसत-खेळत जेवण केले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, “अनाथ आणि वंचित मुलं ही आपल्याच घरातील सदस्य आहेत. त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा करणं हे माझ्यासाठी खरी आनंदाची गोष्ट आहे. दरवर्षी असाच उपक्रम राबवण्याचा माझा निर्धार आहे.”

या उपक्रमाची माहिती पसरताच  सोशल मीडियावरून तसेच प्रत्यक्ष भेटुन नागरिकांनी अमोल जाधव यांचे अभिनंदन केले. अनेकांनी तर हा उपक्रम “आधुनिक समाजाला दिलेला एक मौल्यवान संदेश” असल्याचे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख गणेश नेपते, शहर प्रमुख बापूसाहेब भोसले, उपशहर प्रमुख रमेश चिवचिवे, नितीन मस्के, संजय लोंढे, भुजंग मुकेरकर, रितेश जावळेकर, शहाजी हाक्के, स्वप्निल सुरवसे, आप्पासाहेब पाटील, अंकुश पाटील, गोपाळ आदटराव, नंदुकुमार क्षीरसागर, मीनाताई सोमाजी, राधा घोगरे, रेणूका शिंदे, सारिका तेलंग, सुवर्णा उमाप, आरुणा कावरे यांच्यासह  शिवसैनिक  उपस्थित होते.

खऱ्या अर्थाने, हा वाढदिवस केवळ अमोल जाधव यांचा नव्हता, तर तो त्या सर्व मुलांचा आनंदोत्सव ठरला. मानवतेचा स्पर्श आणि नात्यांची ऊब हीच खरी भेट असल्याचे या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाले.
 
Top