नदीत पाण्याचा प्रवाह अचानक वाढला.मायलेकीचा वाहुन गेल्यामुळे मृत्यु.
मुरुम,दि.०३ : डॉ सुधीर पंचगल्ले
जळकोट तालुक्यात अतिशय दुर्दैवी घटना घडली असून, तिरू नदीमधील पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्यामुळे मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी अकराच्या दरम्यान घडल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की , जळकोट तालुक्यातील मर सांगवी येथील कौशल्या अजय वाघमारे वय ३५ व रुक्मिणी अजय वाघमारे वय १४ या दोघी मायलेकी मरसांगवी येथीलच मरीबा वाघमारे यांच्या शेतामधील कापूस वेचण्यासाठी मजुरीने जात होत्या . कापूस वेचण्यासाठी चे शेत नदीपलीकडे होते . शेताकडे जात असताना नदीमध्ये पाणी कमीच होते . मात्र तिरू नदीमधील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे या दोघीही पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्या व दुर्दैवी या दोघींचाही मृत्यू झाला .
सदरील मायलेकी वाहून गेल्याची माहिती मिळताच गावातील काही जन नदीपात्रात धावले व मायलेकीला काढण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत दुर्दैवी मृत्यू झाला होता . मायलेकीचा एकाच वेळी दुर्दैव मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे .
तिरू प्रकल्पामधून पाणी सोडल्यामुळे प्रवाह वाढला
मरसांगवी गावाच्या वरच्या बाजूकडून तिरू प्रकल्प आहे . हा तिरू प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे . दररोज या तिरू प्रकल्पाचे गेट उघडून पाणी नदीपत्रात सोडले जात आहे . अचानक तिरू नदीपत्रातून पाणी सोडण्यात आले . व मरसांगवी येथे पाण्याचा प्रवाह अचानक वाढला, तसेच पाण्याचा वेग देखील वाढला . यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघीही मायलेकीच्या मृत्यू झाला असल्याची माहिती येथील सरपंच रवी गोरखे व चेअरमन उमाकांत इमडे यांनी दिली .
अनेक दिवसापासून होत आहे पुलाची मागणी
मर सांगवी हे गाव तिरू नदी काठावर आहे तसेच तिरुनिदीला महापूर आल्यानंतर या गावांमध्ये देखील महापुराचे पाणी शिरते . अनेक वेळा गावातील नागरिकांना माळावर जाऊन बसावे लागले होते . या गावातील नागरिकांना नदीच्या पात्राच्या पलीकडे असलेल्या शेताकडे जाण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो . आता यावर्षी तर सतत नदीपात्रातून पाणी वाहत आहे यामुळे शेतक-यांची शेताकडे जाणे बंदच झाले आहे . अनेक वेळा नदीपात्रातून पुढे शेताकडे जाण्यासाठी जो मार्ग आहे त्या ठिकाणी पुल उभा करावा अशी मागणी गावक-यांनी केली होती . अनेक राजकीय तसेच विविध अधिका-यांनी या गावाला भेटी देऊन या ठिकाणाची पाहणी केली होती . यावेळी गावक-यांनी पूल उभा करावा अशी मागणी केली होती . परंतु पूल उभा करण्यात आला नाही . जर या ठिकाणी पूल असता तर या दोघींचा जीव वाचला असता अशी देखील चर्चा सध्या गावात सुरू आहे .
पुरामुळे दोन महिन्यात सहा जणांचा मृत्यू
जळकोट तालुक्यात या वर्षी अतिवृष्टीने कहर केला . यामुळे अनेक नद्यांना पुर आला . तालुक्यात या दोन ते तिन महिन्यात पुरामध्ये वाहून गेल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे . यास कमी उंचीचे पुल तसेच पुल नसणे हे प्रमुख कारण आहे . या पुरामुळे माळहिप्परगा येथील शान सुर्यवंशी व वैभव गायकवाड दोघेजण वाहून गेले होते तसेच तिरुका येथील सुदर्शन घोनशेट्टे हा वाहून गेला होता व या तिघांचा पुरात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला . तसेच तालुक्यातील ढोरसांगवी येथील बालाजी पोतने हे शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेले होते . तर आता मरसांगवी येथील दोघी माय लेकीचा मृत्यू झाला आहे .