राज्यपाल समवेत बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाची बैठकीत एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यासह विविध विषयांवर चर्चा
धाराशिव,दि.२३:
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांच्या समवेत बुधवार रोजी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक होऊन बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यासह विविध विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली असल्याचे धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रकाश चव्हाण यांनी सांगितले.
मुंबई येथील राजभवनात राज्यपाल समवेत बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली.याप्रसंगी बंजारा पारंपरिक पद्धतीने त्याचे स्वागत करण्यात आले.आणि बंजारा समाजाचे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ज्यात बंजारा समाजाचा समावेश आदिवासी संवर्गात करण्यात यावा, यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेऊन निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी तसेच धनगर समाजा प्रमाणे आदिवासी संवर्गाच्या सर्व योजना बंजारा समाजाला लागू करण्यात यावा
सर्वसाधारण संवर्गात मागासवर्गीयानी अर्ज करु नये हा जी.आर. रद्द करून सर्वसाधारण संवर्गात सर्वांना अर्ज करण्याची संधी पुर्ववत उपलब्ध करावी, बंजारा तांड्यावरच्या शाळा कमी संख्या असल्याने बंद करु नये यांचा समावेश होता.
यावेळी विधान परिषदेचे माजी आमदार राजेश राठोड, माजी मंत्री अमरसिंह तीलावत,राजु नाईक, माजी सदस्य प्रकाश चव्हाण, राधेश्याम आडे, सुभाष तंवर, रामराव महाराज भाटेगावकर, सुरेश पवार, सतिश जाधव, राजेश चव्हाण, सुनील राठोड, शिवाजी चव्हाण आदी उपस्थित होते.