घाणीच्या साम्राज्यातील आठवडी बाजारावर बंजारा समाजाचा बहिष्कार?; नळदुर्गच्या व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता

नळदुर्ग, दि. २३ जुन :
घाणीचे साम्राज्य, उघड्या गटारी आणि अपुऱ्या सुविधांमुळे नळदुर्ग शहरातील आठवडी बाजाराविरोधात नाराजी वाढत असून, या बाजारावर बंजारा समाज बहिष्कार टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती समाजाचे प्रतिनिधी रवी महाराज राठोड यांनी दिली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे शहरातील व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नळदुर्ग शहराचा विस्तार गेल्या काही दशकांत मोठ्या प्रमाणावर झाला आहे. पूर्व-पश्चिम दिशेने वाढलेल्या शहराच्या तुलनेत आठवडी बाजार मात्र अद्यापही पूर्वेकडील एका कोपऱ्यात जुन्या जागेवरच भरत आहे. सुमारे ४० वर्षांपूर्वी त्या काळातील शहररचनेनुसार निश्चित करण्यात आलेली ही जागा आजच्या वाढत्या लोकसंख्येला आणि वाहतुकीला पूरक राहिलेली नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.

बाजार भरत असलेल्या परिसरात स्वच्छतेचा अभाव, उघड्या गटारी, अरुंद रस्ते आणि पार्किंगची गैरसोय यामुळे ग्राहकांसह विक्रेत्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात चिखल, साचलेले पाणी आणि दुर्गंधीमुळे बाजार परिसरातील परिस्थिती अधिकच बिकट होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शहरातील वसंतनगर, दुर्गानगर, इंदिरानगर, ठाकरेनगर, व्यंकटेशनगर, जगतापनगर आणि व्यासनगर आदी नव्याने विकसित झालेल्या भागांतील नागरिक या बाजाराकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गैरसोयीच्या स्थानामुळे अनेक ग्राहक खरेदीसाठी शहराबाहेरील बाजारपेठा किंवा आधुनिक व्यापारी संकुलांचा पर्याय स्वीकारत आहेत.
काळानुरूप बदल स्वीकारत काही व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय इतर भागात स्थलांतरित केले आहेत. तर काही दुकानदारांच्या व्यवसायावर याचा प्रतिकूल परिणाम झाल्याची चर्चा आहे. आठवडी बाजारातील ग्राहकसंख्या घटल्याने स्थानिक व्यापारावरही परिणाम जाणवत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

नळदुर्गची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात कष्टकरी बंजारा समाजाच्या खरेदी-विक्रीवर अवलंबून असल्याचे मानले जाते. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे आठवडी बाजाराच्या दिवशी नळदुर्गमध्ये येऊन आवश्यक वस्तूंची खरेदी करतात. त्यामुळे बंजारा समाजाने बाजारावर बहिष्कार टाकल्यास स्थानिक व्यापाराला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, लोहगाव, शहापूर, होर्टी, अणदूर आदी परिसरातील गावांमध्येही आठवडी बाजार भरत असल्याने ग्राहकांना पर्यायी बाजारपेठा उपलब्ध आहेत. त्यामुळे नळदुर्गच्या आठवडी बाजारातील सुविधांचा प्रश्न तातडीने सोडविण्याची गरज व्यक्त होत आहे.

नागरिकांनी बाजाराचे स्थलांतर शहराच्या मध्यवर्ती व प्रशस्त ठिकाणी करण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे आणली आहे. तसेच स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

बंजारा समाजाच्या बहिष्काराच्या इशाऱ्यानंतर नगरपरिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे आता व्यापारी, विक्रेते आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top