आरळी खुर्दची शाळा : ज्ञानासोबत हिरवाईचीही नवी वाटचाल...!
शिक्षकांचे समर्पण, विद्यार्थ्यांची गुणवत्तापूर्ण झेप अन् ग्रामस्थांचा लोकसहभाग ; ‘हरित शाळा’ उपक्रमातून २०० वृक्षांची लागवड
अनिल आगलावे
तुळजापूर : ग्रामीण भागातील शाळा म्हटले की मर्यादित साधनसुविधा, पालकांची आर्थिक परिस्थिती आणि विविध अडचणी असे चित्र डोळ्यासमोर येते. मात्र, या चौकटीपलीकडे जाऊन शिक्षकांचे नियोजन, विद्यार्थ्यांची मेहनत, व्यवस्थापन समितीचे पाठबळ आणि ग्रामस्थांचा लोकसहभाग यांची सांगड घातली तर ग्रामीण शाळाही गुणवत्तेच्या शिखराकडे वाटचाल करू शकते, हे आरळी खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने दाखवून दिले आहे.
शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या या शाळेने आता ‘हरित शाळा’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचीही नवी दिशा स्वीकारली आहे. लोकसहभागातून शाळेच्या परिसरात सुमारे २०० वृक्षांची लागवड करण्यात आली असून, ज्ञानमंदिराचा परिसर हिरवाईने नटविण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरू लागला आहे.
वाढदिवसाचा खर्च टाळून शाळेसाठी मदतीचा हात
गावातील प्रा. संतोष कोठावळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या कन्या कु. सृष्टीताई संतोष कोठावळे यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत शाळेसाठी योगदान देण्याचा निर्णय घेतला. सृष्टीताईचा वाढदिवस २७ ऑगस्ट रोजी असून, वाढदिवसाचा आनंद वृक्षारोपणातून आणि शाळा हिरवीगार करून साजरा व्हावा, अशी त्यांची भावना आहे.
यासाठी कोठावळे यांनी ५ हजार रुपयांचा मदत निधी देत वृक्ष खरेदीसाठी सहकार्य केले. त्यांच्या सहकार्याने आणलेल्या वृक्षांचे रोपण त्यांचे पुतणे प्रणव कोठावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमर वाघमारे, कांबळे तसेच शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दीपक पुरी यांनीही शाळा आदर्श बनावी, विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळाव्यात आणि शाळेचा परिसर हिरवाईने नटावा या उद्देशाने २ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत केली. त्यांच्या सहकार्याने आणलेल्या वृक्षांचे वृक्षारोपण त्यांच्या हस्ते करण्यात आले. या दोन्ही ग्रामस्थांनी मिळून ७ हजार ५०० रुपयांचे आर्थिक योगदान देत शाळेच्या वृक्षलागवड व ‘हरित शाळा’ उपक्रमाला मोलाचे बळ दिले आहे. लोकसहभागातून शाळेच्या विकासासाठी उभे राहणारे हे उदाहरण निश्चितच इतर ग्रामस्थांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
गुणवत्तेच्या वाटेवर विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी...
आरळी खुर्दची शाळा केवळ पाठ्यपुस्तकातील अभ्यासापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक आणि व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, वाचन संस्कृती, गणित-विज्ञान प्रयोग, व्यक्तिमत्व विकास आणि नियमित सराव यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सातत्याने भर पडत आहे. यंदाच्या एनएमएमएस स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेच्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली. ग्रामीण भागातील मर्यादित साधनसुविधांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश पालक, ग्रामस्थ आणि शाळेसाठी अभिमानाची बाब ठरले आहे.
शिक्षकांचा अतिरिक्त वेळ, विद्यार्थ्यांच्या यशाची पायाभरणी...
विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. नियमित विशेष मार्गदर्शन वर्ग, आठवड्याला सराव परीक्षा, वैयक्तिक प्रगतीचे विश्लेषण, कमकुवत घटकांवर स्वतंत्र लक्ष आणि पालकांशी सातत्यपूर्ण संवाद यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला. शिक्षकांनी शाळेच्या नियमित वेळेनंतरही अतिरिक्त वेळ देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक राजकुमार म्हेत्रे यांच्यासह आदेश वाघमारे, अभिजित धाबेकर आणि भूषण ठाणबिरे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सुखदेव भालेकर, श्रीमती योगिता शिनगारे, श्रीमती वर्षा कोल्हाळे आणि शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या पाठीशी व्यवस्थापन समिती अन् ग्रामस्थ...
शाळेच्या गुणवत्तावाढीच्या प्रयत्नांना शालेय व्यवस्थापन समितीचे सातत्यपूर्ण सहकार्य लाभत आहे. समितीचे अध्यक्ष सुभाष सोमवंशी, उपाध्यक्ष दीपक पुरी, सदस्य लक्ष्मण पारवे यांच्यासह सर्व सदस्य शाळेच्या विकासासाठी सातत्याने पाठबळ देत आहेत.
शैक्षणिक गुणवत्ता आणि पर्यावरण संवर्धन या दोन्हींची सांगड घालत आरळी खुर्दची शाळा ग्रामीण शिक्षणाच्या क्षेत्रात वेगळा आदर्श निर्माण करत आहे. एका बाजूला स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची यशस्वी झेप, तर दुसऱ्या बाजूला शाळेच्या आवारात वाढणारी हिरवाई—ही शाळेच्या सर्वांगीण वाटचालीचीच साक्ष आहे.
‘गुणवत्तेची परंपरा, यशाची हमी’ ही ओळ आता केवळ शाळेची ओळख न राहता शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नांची प्रेरणादायी कहाणी बनत आहे. ज्ञानाची रोपे रुजविणाऱ्या या शाळेत आता २०० वृक्षांची हिरवी रोपेही भविष्यातील पिढीसाठी सावली, शुद्ध हवा आणि पर्यावरणाची जाणीव घेऊन वाढणार आहेत.
आरळी खुर्दची ही वाटचाल सांगते—शाळा बदलायची असेल तर केवळ इमारत नव्हे, तर विचारांची हिरवाईही वाढवावी लागते; आणि त्यासाठी शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ एकत्र आले की परिवर्तन निश्चित घडते.