नळदुर्ग -: भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य विश्‍वातील मानव जातीच्‍या भावी पिढ्याना प्रेरणादायी असून केवळ त्‍यांच्‍या संविधानामुळेच भारत देशाची राष्‍ट्रीय एकात्‍मता अबाधित असल्‍याचे मत रिपाइंचे तुळजापूर तालुकाध्‍यक्ष एस.के. गायकवाड यांनी सिंदगाव (ता. तुळजापूर) येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना व्‍यक्‍त केले.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्‍सव मंडळ, सिंदगावच्‍यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या 122 व्‍या जयंती निमित्‍ताने दि. 26 एप्रिल रोजी व्‍याख्‍यान, भिमगित गायन व मान्‍यवरांच्‍या सत्‍काराच्‍या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून  एस.के. गायकवाड हे बोलताना म्‍हणाले की, महात्‍मा गौतम बुध्‍द, संत रविदास, संत कबिर, महात्‍मा जोतीराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आदी महामानवांच्‍या विचाराना एकत्रित करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी जगात सर्व श्रेष्‍ठ असे भारतीय संविधान तयार करुन लोकशाही शासन प्रणाली या देशाला दिली. म्‍हणूनच आज सर्वसामान्‍य माणूस हा निर्भयपणे स्‍वाभिमानाचे जिवन जगत आहे.
    या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक चंद्रकांत शिंदे यानी तर सुत्रसंचालन प्रा. जयहिंद वाघमारे यांनी केले. यावेळी जेष्‍ठ कार्यकर्ते ब‍लभिम पांढरे, सिद्रामप्‍पा परशेटी, पिरसाहेब बागवान, ज्ञानेश्‍वर रेड्डी, संजय बेडजिरगे, व्‍यंकट मेलगिरी, मलिक शिंदे, राजेंद्र शिंदे, माजी सरपंच लक्ष्‍मण शिंदे आदीजण उपस्थित होते. दि. 27 एप्रिल रोजी सकाळी डॉ. आंबेडकर यांच्‍या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढून जयंती उत्‍सवाची सांगता करण्‍यात आली.
 
Top