अणदूर :- स्त्रीभ्रुण हत्या हा विषय अत्यंत महत्त्वाचा असून याविषयी समाजात जनजागरण करण्याचे विधायक कार्य सार्वजनिक गणेश मंडळाने केले असून हे कार्य कौतुकास्पद आहे. सध्या मुलींचे घटते प्रमाण लक्षात घेऊन यावर समाजातील सर्वच घटकानी विशेष प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जवाहर महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. अनिता मुदकण्णा यानी केले.
अणदूर ता. तुळजापूर येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त स्त्रीभ्रूण जनजागृती अभियान राबविण्यात आले. आयोजित स्त्रीभ्रुण जनजागरण रॅलीमध्ये पाचशे विद्यार्थिनी व महिलांचा समावेश होता. ही रॅली सकाळी जवाहर महाविद्यालयापासून मारूती मंदिर मार्गे काढून अण्णा चौकात समारोप करण्यात आला. यावेळी प्राचार्य मुदकण्णा बोलत होत्या. या रॅलीचे नेतृत्व राष़्ट्र सेवा दलाच्या रूपाली माने, सेवा दलाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष बळीराम जेठे यानी केले. या कार्यक्रमास जळकोट ता. तुळजापूर येथील अंबव्वा महिला मंडळाच्या कस्तुरा कारभारी, आपलं घरचे व्यवस्थापक शिवाजी पोतदार, सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष पप्पू धमुरे, प्रशांत पोतदार, अमोल सालगे, राचप्पा जिडगे, दयानंद मुडके यांच्यासह परिसरातील शाळेचे विद्यार्थी, युवक कार्यकर्ते नागरीक उपस्थित होते.