मुंबई -: दुस-या कसोटीतील पहिल्या डावात टीम इंडियाच्या सर्वबाद 327 धावा झाल्या. सकाळच्या सत्रातच सुरूवातीलाच आर अश्विन (68), शतकवीर चेतेश्वर पुजारा (135), हरभजन सिंग (21) आणि झहीर खान (11) यांच्या खेळीमुळे टीम इंडियाने 300 धावांचा टप्पा पार केला. मॉंटी पानेसरने 5 तर ग्रीम स्वानने 3 विकेट पटकाविल्या.
तत्पूर्वी, कालच्या 60 धावांमध्ये 8 धावांची भर घालून अश्विन बाद झाला. त्याला पानेसरने आपल्या फिरकीच्या जाळयात ओढले. सातव्या विकेटसाठी पुजारा-अश्विन जोडीने 111 धावांची भागीदारी केली. अश्विन पायचित बाद झाला. दिर्घ विश्रांतीनंतर टीम इंडियात परतेल्या हरभजन सिंगने 21 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. स्वानने त्याला पायचित केले. हरभजनने 2 चौकार आणि 1 षटकारासह 21 धावा केल्या. झहीर खाननेही 1 चौकार आणि 1 षटकारासह 11 धावा केल्या. त्याला स्वाननेच टिपले.
वानखेडेच्या या पिचवर 300 धावा पुरेशा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या धावाही इंग्लंड संघाला डोंगराएवढया भासतील. फिरकीपटूला साथ देणारे हे पिच आहे. त्यामुळे टीम इंडियाने तीन फिरकीपटूंना संघात खेळवले आहे.