नळदुर्ग -: कृषी विभागाच्या योजनाचा लाभ घेऊन शेतक-यांनी स्वतःची उन्नती करावी, भारतीय स्टेट बँक, नाबार्ड व कृषी विभाग यांच्याकडून शेतक-यांच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. नियमित खातेदारानी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन स्वतःची उन्नती करून घ्यावी, असे आवाहन परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारूती बनसोडे यांनी केले.
तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी, फुलवाडी, धनगरवाडी या गावात भारतीय स्टेट बँक शाखा अणदूर व परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग यांच्यावतीने आयोजित केलेल्या शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यात बनसोडे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रा.पं. सदस्य रेवण स्वामी हे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सिद्रामप्पा खजुरे, बँकेचे व्यवस्थापक चंद्रकांत सोनकांबळे, कॅशियर वैजिनाथ मुंडे, ग्रा.पं. सदस्य शिवाप्पा जवळगे, सोसायटीचे चेअरमन सचिन नरवडे आदीजण उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येनी उपस्थित होते. यावेळी बँकेचे व्यवस्थापक चंद्रकांत सोनकांबळे बोलताना म्हणाले की, बँकेचे थकित खातेदार शेतकरी यांनी बँकेत येऊन नव्याने कर्जाचा प्रस्ताव सादर करावा व थकित कर्ज परतफेड करून बँकेस सहकार्य करावे. बँकेचे बचत खातेदार यानी शंभर रूपये शुल्क भरून अपघाती विमा संरक्षण घ्यावे. 18 ते 65 वयोगटातील लोकांसाठी ही योजना लागू आहे. याचा लाभ घ्यावा, असेही वैजिनाथ मुंडे यांनी सांगून सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सिद्रामप्पा खजुरे यांनी तर सूत्रसंचालन शिवाप्पा जवळगे यांनी केले.