नळदुर्ग -: उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्याबरोबरच शेतकरी, कामगार, निराधार, तसेच जिल्ह्यातील विविध प्रश्नांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सोमवार दि. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता मनसेचे जिल्हासंपर्क अध्यक्ष्ा कर्णबाळा दुनबळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मनसेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मनसेच्या तालुका शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.
शासनाने उस्मानाबाद जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, जिल्ह्यातील साखर कारखाने व नगरपरिषेदत काम करणा-या कामगारांचे पगार तात्काळ देण्यात यावे, ज्या कारखान्यांकडे शेतक-यांच्या ऊसाचे पैसे राहिले आहेत, हे तात्काळ द्यावे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील बिगर शेती कर्जदारांची थकबाकी वसूल करण्यासाठी मालमत्ता जप्तीची मोहीम त्वरीत सुरू करावी, ऊसाचा पहिला हप्ता तीन हजार रूपये जाहीर करावा, दारिद्रय रेषेखाली असणा-या कुटुंबाची उत्पन्न मर्यादा पंधरा हजारावरून पन्नास हजार रूपये करण्यात यावी, शेतक-यांचे वीज बील पूर्ण माफ करावे, आदी मागण्यांसाठी मनसेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात तुळजापूर तालुक्यातील मनसेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर नागरिकानी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष राजकुमार कोरेकर, तालुका चिटणीस ज्योतीबा येडगे यांनी केले आहे.