नळदुर्ग -: दिल्‍ली येथे वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणा-या युवतीवर गेल्‍या आठवड्यात काही नराधमांनी सामुहिक रित्‍या केलेल्‍या बलात्‍काराच्‍या अनुषंगाने महिलावरील होणा-या अत्‍याचार प्रतिबंधाचा प्रश्‍न पुन्‍हा एकदा ऐरणीवर आला आहे. राजधानी दिल्‍लीमध्‍ये घडलेल्‍या घटनेचा निषेध व्‍यक्‍त करत यापुढे युवती व महिलांवर अन्‍याय, अत्‍याचार होऊ नयेत, या दृष्‍टीने वेळीच दक्षता घेण्‍याच्‍या मागणीसह वरील दोषी नराधमावर कडक कारवाई करुन कठोर शिक्षा करण्‍याची मागणी तुळजापूर तालुक्‍यातील विविध सामाजिक संस्‍था व महिला दक्षता समितीच्‍यावतीने केली जात आहे. .
         आज स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या माध्‍यमातून शहरी व ग्रामीण भागामध्‍ये महिला आरक्षणामुळे महिला राज निर्माण झाले. विविध शासकीय, निमशासकीय क्षेत्रामध्‍ये महिला या पुढे आल्‍या. तरी परंतु बदलत्‍या काळाबरोबरच महिलांवर होणारे अत्‍याचाराचे प्रमाण थांबविण्‍यासाठी महिला हिंसाचार प्रतिबंधक कायदा करुन महिलांसाठी सुरक्षा कवच निर्माण केले जात असले तरी परंतु महिला हिंसाचाराच्‍या बळी पडल्‍याच्‍या घटना एकामागून एक उजेडात येत आहेत. यावरुन महिला अत्‍याचार प्रतिबंधक कायद्यासंबंधी निर्माण करण्‍यात आलेली यंत्रणा कुचकामी असल्‍याचे दिल्‍ली येथील युवतीवर झालेल्‍या सामुहिक बलात्‍काराच्‍या दुर्दैवी घटनेने पुन्‍हा एकदा स्‍पष्‍ट झाले आहे. एका महाविद्यालयीन युवतीवर झालेला हा सामुहिक अत्‍याचार म्‍हणजे हे एक अमानवी कृत्‍य असून माणुसकीला जणू काळीमाच आहे. या निंदनीय घटनेचा निषेध व्‍यक्‍त करत तुळजापूर तालुक्‍यातील सामाजिक संस्‍था व संघटना सह महिला दक्षता समितीच्‍यावतीने जिल्‍ह्यातील राष्‍ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग पोलीस ठाण्‍यासह ग्रामीण भागातील विविध पोलीस ठाण्‍यामध्‍ये स्‍वतंत्र महिला तक्रार निवारण केंद्र स्‍थापन करण्‍याची महिलांतून एकमुखी मागणी होत आहे. महिलावरील हिंसा, महिला व बालव्‍यापार शिवाय होणारे लैंगिक शोषण, ग्रामीण भागामध्‍ये अल्‍पवयीन मुलींला आमीष दाखवून पळविण्‍याचे प्रकार घडत आहेत. शिवाय महाविद्यालयीन युवतींची होणारी छेडछाड यामुळे मुलींमध्‍ये एक दहशतीचे वातावरण निर्माण झाल्‍याने याला पायबंद घालण्‍यासाठी पोलीस यंत्रणा व सामाजिक संस्‍था व संघटना, महिला तक्रार निवारणाशी संबंधित महिला, तंटामुक्‍त समिती यांच्‍यामध्‍ये वेळोवेळी समन्‍वय साधण्‍याची गरज वर्तविली जात आहे. याच धर्तीवर कायद्याशी संबंधित यंत्रणेची ठोस अंमलबजावणी होऊन दोषींवर कडक कारवाई व कठोर शिक्षा केल्‍यास दिल्‍ली येथे घडलेल्‍या गंभीर महिला अत्‍याचाराची पुनरावृत्‍ती होणार नाही, अशी मागणी नळदुर्ग येथील पोलीस ठाण्‍याचे सहायक पोलीस निरीक्षक यांच्‍या मार्फत महाराष्‍ट्र राज्‍याचे मुख्‍यमंत्री यांना करण्‍यात आली आहे.
     नळदुर्ग पोलीस ठाण्‍याचे पोलीस उपनिरीक्षक मुबारक शेख यांना दिलेल्‍या निवेदनावर परिवर्तन सामाजिक संस्‍थेचे सचिव मारूती बनसोडे, आधार संस्‍थेचे सचिव दयानंद काळुंके, ज्ञानकिरण संस्‍थेचे अध्‍यक्ष भैरवनाथ कानडे, पत्रकार शिवाजी नाईक, माजी नगराध्‍यक्षा निर्मला गायकवाड, दमयंती महिला शिक्षण संस्‍थेच्‍या अध्‍यक्षा सुभद्रा मुळे, अंबव्‍वा महिला मंडळाच्‍या कस्‍तुरा कारभारी, दक्षता समितीच्‍या सदस्‍या शाहेदाबी सय्यद, कल्‍पना गायकवाड, संगीता गायकवाड, पौर्णिमा संस्‍थेच्‍या अध्‍यक्षा बाबई चव्‍हाण, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर बनसोडे आदींच्‍या स्‍वाक्ष-या आहेत.
 
Top