राज्यातील विविध २५ जिल्ह्यांमधील सर्वसाधारणत: ९१२ ग्रामपंचायतींच्या एप्रिल ते सप्टेंबर २०१३ या कालावधीत मुदती संपत आहेत. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसह इतर काही ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने हा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या सर्व ग्रामपंचायतींची प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेची १५ जानेवारी २०१३ रोजी अस्तित्वात असलेली व अंतिमरित्या प्रसिद्ध झालेली मतदार यादी ग्राह्य धरण्यात येईल. प्रारुप स्वरुपातील ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय मतदार याद्या मतदारांच्या परीक्षणासाठी तसेच हरकती व सूचना मागविण्याकरिता ८ फेब्रुवारी २०१३ रोजी ग्रामपंचायतींच्या चावडीवर व इतर संबंधित ठिकाणी सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येतील. स्थानिक मतदारांना या यादीसंदर्भात आक्षेप असल्यास त्यांनी ते लेखी स्वरुपात १५ फेब्रुवारी २०१३ पर्यंत संबंधित तहसील कार्यालयात दाखल करावेत. आक्षेपांची तपासणी झाल्यानंतर २० फेब्रुवारी २०१३ रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील, असेही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
ठाणे-२६, रायगड-१९१, रत्नागिरी-०२, सिंधुदुर्ग-०३, नाशिक-१८, धुळे-०७, जळगाव-६७, अहमदनगर-८८, पुणे-१२७, सोलापूर-१६, सातारा-९६, सांगली-८४, कोल्हापूर-७७, औरंगाबाद-११, बीड-१९, नांदेड-१३, परभणी-०१, उस्मानाबाद-०३, जालना-०१, लातूर-०६, अकोला-०४, यवतमाळ-३०, वर्धा-१४, चंद्रपूर-०३, गडचिरोली-०५, एकूण - ९१२.