मोहाली :-  कमालीची रंगतदार ठरलेली तिसरी कसोटी अखेर टीम इंडियाने सहा विकेटने जिंकली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सलग तीन चौकार ठोकून विजयावर शिक्‍कामोर्तब केला. शेवटच्‍या काही षटकांत चेंडू आणि धावांचे गुणोत्तर बरोबर झाल्‍यानंतर सामना अनिर्णीत राहतो की काय अशी परिस्थिती झाली होती. त्‍यातच सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली बाद झाल्‍यानंतर भारतीय तंबूत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, धोनीने आपल्‍या खांद्यावर जबाबदारी घेत अखेर टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
      ऑस्‍ट्रेलियाकडून 133 धावांचे आव्‍हान घेऊन उतरलेल्‍या टीम इंडियाने सलामीच्‍या जोडीत बदल करून पहिल्‍या डावातील विक्रमवीर शिखर धवनऐवजी चेतेश्‍वर पुजाराला मुरली विजयबरोबर फलंदाजीस पाठवले होते. दोघांनी 42 धावांची सलामी दिल्‍यानंतर डोहर्तीला पुढे सरसावून खेळण्‍याचा मोह विजयला महागात पडला. तो 26 धावांवर यष्‍टीचीत झाला. त्‍यानंतर पुजाराही 28 धावा करून लियोनच्‍या गोलंदाजीवर बाद झाला. विराट कोहली 34 आणि सचिन तेंडुलकर यांनी 21 धावा केल्‍या. धोनी 18 आणि जडेजा 8 धावांवर नाबाद राहिले.
   
शिखर धवनला सामनावीराचा पुरस्‍कार देण्‍यात आला. ऑस्‍ट्रेलियाकडून पीटर सिडल, नॅथन लियोन आणि झेवियर डोहर्ती यांनी एक-एक गडी बाद केले.
         या विजयाबरोबर टीम इंडियाने मालिकेत 3-0 ने विजयी आघाडी घेतली असून पुढील कसोटी 22 मार्चपासून दिल्‍ली येथील फिरोजशाह कोटला मैदानावर होणार आहे.
 
* सौजन्‍य दिव्‍यमराठी

 
Top