तुळजापूर -: मोफत भोजनासह दररोज 500 रुपये रोजगार देतो, असे सांगून एका व्‍यक्‍तीने शिरगापूर (ता. तुळजापूर) येथील दोघा इसमाना नेऊन फसवणूक केल्‍याची तक्रार उस्‍मानाबाद जिल्‍हा पोलीस अधिक्षकांकडे पांडुरंग लक्ष्‍मण जाधव यांनी केली आहे.
    उस्‍मानाबाद पोलीस अधिक्षकांना पांडुरंग जाधव यांनी दिलेल्‍या तक्रारीत म्‍हटले आहे की, तुळजापूर तालुक्‍यातील शिरगावपूर या गावचा रहिवाशी असून माझे वडील लक्ष्‍मण जाधव व तुकाराम अर्जून गायकवाड या दोघांना प्रकाश गायकवाड यानी दि. 3 मार्च रोजी बांधकाम करायचे असून मी गुतेदारी करतो, असे सांगून वरील दोघांना कामाला लावत म्‍हणून घेऊन गेला. माझे वडील लक्ष्‍मण हे माझे चुलते भारत जनार्धन जाधव यांच्‍याकडे कामाला होते. भारत जाधव व प्रकाश गायकवाड यांची पूर्वीपासून ओळख असून तो हन्‍नूर (ता. अक्‍कलकोट) येथील रहिवाशी असल्‍याचे समजल्‍यावरुन हन्‍नूर येथे वडिलांना शोधण्‍यासाठी गेलो असता, प्रकाश गायकवाड हा गेल्‍या दिड वर्षापासून गावी आला नसल्‍याचे सांगण्‍यात आले. याप्रकरणात माझ्या वडिलासह तुकाराम गायकवाड यांची फसवणूक झाल्‍याचा संशय असून वरील दोघांना आमच्‍याशी कसल्‍याही प्रकारचा संपर्क करु देत नाही, त्‍याचबरोबर त्‍यांच्‍या जीवितास धोका असून यातील तुकाराम गायकवाड याने एके दिवशी 094440640874 या क्रमांकावरुन फोन केला होता. त्‍यानंतर त्‍यांच्‍याशी संपर्क नाही. पोलिसांनी याप्रकरणी कसून शोध घेऊन आम्‍हाला न्‍याय मिळवून द्यावे, अशी मागणी करण्‍यात आली आहे. या निवेदनाची एक प्रत नळदुर्ग पोलीस ठाणे येथे देण्‍यात आली आहे.
 
Top