बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- महिलांच्‍या हक्‍कावर गदा आणणा-यांना नेहमीच विरोध राहील, असे सांगून सार्वजनिक ठिकाणीही होत असलेल्‍या अन्‍याय, अत्‍याचाराला उत्‍तर देण्‍यासाठी महिलांनी सामुहिकपणे सज्‍ज राहिले पाहिजे, असे मत उमरगा येथील कॉ. प्रा. सुनीता चावला यांनी व्‍यक्‍त केले.
    आयटक कामगार केंद्र बार्शीच्‍यावतीने महिला कामगारांसाठी मार्गदर्शन मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते, याप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. अध्‍यक्षस्‍थानी कॉ. प्रा. तानाजी ठोंबरे, अभिनव माध्‍यमिक विद्यालयाच्‍या प्रा. माधवी वायकुळे यांच्‍यासह आदी मान्‍यवर उपस्थित होते.
    पुढे बोलताना प्रा. सुनीता चावला म्‍हणाल्‍या, पुरुषांच्‍या बरोबरीने काम करुनही अनेकवेळा घरात सन्‍मानाची वागणुक मिळत नाही. वास्‍तविक सामाजिक, सांस्‍कृतिक, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच विविध चळवळींमध्‍ये आजपर्यंत अनेकवेळा महिलाच आघाडीवर राहिल्‍या आहेत, याची जाणीव ठेवावी. अन्‍यायाला उत्‍तर देण्‍यासाठी सामुहिकपणे लढा याही पुढे चालूच ठेवला पाहिजे, असे आवाहन प्रा. चावला यांनी केले.
    प्रा. माधवी वायकुळे म्‍हणाल्‍या, आई अशिक्षित असली तरी मुलांना मात्र शिक्षणाच्‍या प्रवाहात आणण्‍यासाठी तिनेही प्रयत्‍न केले पाहिजे. शिक्षणाबरोबरच उद्योग व्‍यवसायमध्‍येही महिलांनी आपली वेगळी जागा निर्माण करण्‍यासाठी आणखी प्रयत्‍न करायला हवा.
    प्रा. तानाजी ठोंबरे आपल्‍या अध्‍यक्षीय समारोपात म्‍हणाले, सावित्रबाई फुलेंचे कार्य महिलांनी सतत डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. कौटुंबिक पातळीवरही व्‍यसनात अडकलेल्‍या पुरुष मंडळीला आधी त्‍या विळख्‍यातून मुक्‍त केले पाहिजे, तर संसार सुरळीत सुरु राहील.
    यावेळी बबीता गोरे, विद्या कदम, सविता नष्‍टे यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा मस्‍तुद यांनी केले. या कार्यक्रमासाठी कॉ. शौकत शेख, कॉ. प्रविण मस्‍तुद आदीजण उपस्थित होत.
 
Top