सोलापूर -:  दुष्काळी परिस्थितीत अधिका-यांनी अधिक चांगल्या प्रकारे काम करुन केंद्र शासनाच्या विविध योजनांद्वारे दुष्काळी भागात जास्तीत जास्त खर्च करावा, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिल्या.
      केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 23 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांनी सर्व अधिका-यांना सूचना दिल्या. या बैठकीस आमदार गणपतराव देशमुख, दिलीप माने, जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, महापालिका आयुक्त अजय सावरीकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक एच. पी. मूळूक उपस्थित होते.
         अधिका-यांना सूचना देताना केंद्रीय गृहमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, जिल्ह्यात पडलेला दुष्काळ हा सर्व अधिका-यांनी आव्हान म्हणून स्वीकारला पाहिजे. दुष्काळी परिस्थितीत केंद्र व राज्याच्या सर्व योजना दुष्काळी भागातील व्यक्तींपर्यंत प्रयत्नाने पोहोचविल्या पाहिजेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
           जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे राबविण्यात येणा-या इंदिरा आवास योजनेंतर्गत देण्यात येणा-या घरकुलाच्या जागेबाबत सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधींनी जागेबाबत समन्वयाने मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. सन 2009 -10 आणि 2010-11 या आर्थिक वर्षातील खासदार निधीतून करावयाची कामे अद्याप प्रलंबित आहेत. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याकरिता स्पेशल सेलची स्थापना करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावेळी दिल्या. तसेच केंद्र पुरस्कृत योजनांचा फेब्रुवारी 2013 पर्यंत झालेल्या कामाचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. 
          बैठकीच्या सुरुवातीस यापूर्वी झालेल्या जिल्हा दक्षता व सनियंत्रण सभेच्या कार्यवृत्तांवरील मुद्दयांचा अनुपालन अहवाल पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे सादर करण्यात आला. बैठकीचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन मुळुक यांनी केले. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 
Top