सांगली -: सोलापूर व कोल्‍हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने शुक्रवारी सायंकाळी झोडपून काढले. वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. कोल्‍हापूर सांगली मार्गावरील हातकणगले येथे वीज पडून दोघा प्रवाशांचा जागीच मृत्‍यू झाला तर सोलापूर जिल्‍ह्यातील माळशिरस तालुक्‍यात वीज कोसळून एकाचा मृत्‍यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा ते सात वाजण्‍याच्‍या सुमारास घडली.
        भानुदास कांबळे (वय 50, रा. ढालेवाडी, ता. सांगली), विलास भीमराव माने (वय 50, रा.शिरुर-अ‍थणी, ता. चिकोडी) असे असे वीज पडून मरण पावलेल्‍यांचे नाव असून सोलापूर जिल्‍ह्यातील माळशिरस तालुक्‍यात वीज कोसळून मृत्‍यू पावलेल्‍याचे नाव समजू शकले नाही. यातील भानुदास कांबळे व विलास माने हे कोल्‍हापूर-सांगली मार्गावरील हातकणगले येथील सिध्‍दू सर्व्हिसिंग सेंटरजवळ असलेल्‍या कम्‍युनिकेशन सेंटरजवळ झाडाच्‍या आधाराने उभे होते. शुक्रवार रोजी दुपारपासून कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरात जोरदार वादळी वा-सह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी उशिरापर्यंत वादळी वारे आणि पाऊस चालू होता. विजांचा कडकडाटही चालू होता. हातकणगले येथे झाडाच्या आडोशाला उभे राहिलेल्या या प्रवाश्यांना वीज पडल्याने आपला जीव गमवावा लागला, अशी प्रतिक्रिया घटनास्‍थळावरुन उपस्थितातून व्‍यक्‍त करण्‍यात आली.
 
Top