बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- अखिल भारतीय मराठी साहित्‍य परिषदेचे नवोदित मराठी साहित्‍य संमेलन दि. 21 व 22 मे रोजी क्रांतीसूर्य महात्‍मा फुले साहित्‍य नगरी (पुष्‍पक मंगल कार्यालय) उस्‍मानाबाद येथे आयोजन केल्‍याची माहिती पत्रकार परिषदेत स्‍वागताध्‍यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी दिली. संमेलनाध्‍यक्षपदी ज्‍येष्‍ठ साहित्यिक राजन खान निवड करण्‍यात आली असून ग्रंथदिडी, उदघाटन, परिसंवाद, कथाकथन, चर्चासत्र, कविसंमेलन, चित्रप्रदर्शन अशा स्‍वरुपात साहित्‍य संमेलनाचे आयोजन केले आहे.
    या पत्रकार परिषदेस राष्‍ट्रीय कार्याध्‍यक्ष शरद गोरे, विश्‍वस्‍त दशरथ यादव, जिल्‍हाध्‍यक्ष सतीश मडके, तालुकाध्‍यक्ष विनय सारंग आदीजण उपस्थित होते.
    क्रांतीसूर्य महात्‍मा फुले साहित्‍य नगरी असे नाव साहित्‍य संमेलन स्‍थळाला देण्‍यात आले आहे. दुष्‍काळाच्‍या पार्श्‍वभूमीवर होणा-या संमेलनात वृक्षारोपण, पाणी अडवा पाणी जिरवा, जल व्‍यवस्‍थापन इत्‍यादी विषयावर जनजागृती करण्‍यात येणार आहे. राज्‍यातून व राज्‍याबाहेरील सुमारे 1200 लेखक उपस्थित राहणार आहे. साहित्‍य परिषदेच्‍या 350 शाखा असून जवळपास 12 हजार सभासद आहेत. राज्‍याबाहेरही गुजरात, कर्नाटक, छत्‍तीसगड, मध्‍यप्रदेश, गोवा इत्‍यादी ठिकाणचे साहित्यिक या संमेलनास हजेरी लावणार आहेत. संमेलनातील सहभागी साहित्यिकांची निवास व भोजनाची व्‍यवस्‍था मोफत करण्‍यात आली आहे. सहभागी साहित्यिकांना स्‍मृतीचिन्‍ह व प्रमाणपत्र देण्‍यात येणार आहे.
    संमेलनाचे उदघाटन ज्‍येष्‍ठ साहित्‍यीक डॉ.रा.र.बोराडे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात येईल. प्रमुख पाहुणे म्‍हणून मराठा सेवा संघाचे संस्‍थापक अध्‍यक्ष पुरुषोत्‍तम खेडेकर, प्रा. शिवाजीराव सावंत, नाना थोरात हे उपस्थित राहणार आहेत. मंगळवार दि. 21 मे रोजी महाराष्‍ट्रातील मराठीचे अस्तित्‍व या विषयावर परिसंवाद होणार आहे. अध्‍यक्षस्‍थानी एस.डी. नाईक, डॉ. दत्‍ता साकोळे, प्रगती कोळगे, प्रकाश क्षिरसागर, अनंत कदम, किशोर तारे, संजीव अहिरे, जयश्री अंबासकर हे सहभागी होत आहेत. दुपारी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची जलनीती, दुष्‍काळ व्‍यवस्‍थापन हा परिसंवाद होणार आहे. गंगाधार बनबरे, रामचंद्र जाधव, अतुल गायकवाड, सुरेखा शहा हे सहभागी होणार आहेत. सायंकाळी 7 वाजता स्‍वाती‍ शिंदे पवार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली कवी संमेलन होत असून शरद गोरे हे सूत्रसंचान करणार आहे.
    बुधवार दि. 22 मे रोजी सकाळी आठ वाजता प्रसिध्‍द गवी संतोष नारायणकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली कवी संमेलन होत आहे. सकाळी दहा वाजता मराठी भाषेतील विविध प्रवाह या विषयावर परिसंवाद, प्रा. अशोक राणा, डॉ. दादाराव गुंडरे, गुलाब वाघमोडे, दशरथ यादव, डॉ. हरिश्‍चंद्र बोरकर हे सहभाग घेत आहे. दुपारी बारा वाजता प्रा. हनुमंत भूमकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली कथाकथन होत असून सतीश मडके, अरुण गिरी, विशाल वाघमारे, प्रा. यशवंत चंदनशिवे, डॉ. प्रसाद कुलकर्णी, विलास सिंदगीकर सहभागी होतील व सूत्रसंचालन मंजूषा काटकर हे करतील. दुपारी दोन वाजता कृषीप्रधान देशात शेतक-यांची दिशा व दशा या विषयावर रघुनाथदादा पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली परिसंवाद होत आहे. डॉ. रमेश ठाकरे, प्रदिप सोळुंके, अमर हबीब, निशिकांत भालेराव हे सहभागी होतील. दुपारी चार वाजता माधव पवार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली कवी संमेलन होत आहे. सतीश मडके, आनंदकुमार शेंडे हे सूत्रसंचालन करणार आहेत. संमेलनात सहभागी होणा-या साहित्यिकांनी 9922986386, 9881098481, 9763753607, 8793060000, 992188978977 या क्रमांकावर संपर्क साधावा.
    अखिल भारतीय नवोदित साहित्‍य संमेलनासाठी संयोजक सतीश मडके, अतुल गायकवाड, प्रदिप गोरे, बलराज रणदिवे, विनय सारंग, प्रमोद कोराळे, अग्निवेश शिंदे, उपेश घायाळ, ज्ञानेश्‍वर पतंगे, विष्‍णु इंगळे, विजय देशमुख, अनिल जाधव, चंद्रकांत शेवाळे, अजय कांबळे, शेखर गिरी, विशाल वाघमारे, शिवराज मेनकुदळे, संतोष लिमकर, प्राजक्‍ता पाटील, मनिषा राखुडे, जयराज खोचरे, अमेय पवार, राजेंद्र मोरे आदीजण परिश्रम घेत आहेत.
 
Top