किसनराव राठोड
अक्‍कलकोट -: डिग्‍गेवाडी (ता. अक्‍कलकोट, जि. सोलापूर) येथील शांतीस्‍थळ या ठिकाणी राष्‍ट्रीय बंजारा परिषदेच्‍या 'बंजारा साहित्‍य संमेलना' ची जय्यत तयारी सुरु असून प्रथमच याप्रसंगी देशभरातील बंजारा समाजातील विद्वान मंडळी एकत्र येणार आहेत. हे संमेलन येत्‍या दि. 7 जून रोजी होत असून त्‍यानिमित्‍त विविध भरगच्‍च कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. तरी जास्‍तीत जास्‍त संख्‍येनी समाज बांधवानी उपस्थित राहण्‍याचे आवाहन राष्‍ट्रीय बंजारा परिषदेचे अध्‍यक्ष किसनराव राठोड यांनी केले आहे.
    बंजारा साहित्‍य परिषदेचे उदघाटन केंद्रीय कृषीमंत्री ना. शरद पवार यांच्‍या हस्‍ते तर कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी जेष्‍ठ साहित्यिक प्रा. मोतीराज राठोड, स्‍वागताध्‍यक्ष म्‍हणून आश्रमशाळा संघटनेचे राज्‍याध्‍यक्ष लालसिंग राजपूत हे राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री ना. सुशिलकुमार शिंदे, केंद्रीय समाजकल्‍याण राज्‍यमंत्री ना. बलराम नाईक, मुख्‍यमंत्री ना. पृथ्‍वीराज चव्‍हाण, उपमुख्‍यमंत्री ना. अजित पवार, उस्‍मानाबाद जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण, ना. लक्ष्‍मण ढोबळे, ना. हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, ना. मनोहर नाईक यांच्‍यासह अनेक राजकीय, सामाजिक व्‍यक्‍तीसह उद्योगपती, ज्‍येष्‍ठ साहित्यिक, लेखक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.    
    अक्‍कलकोट तालुक्‍यातील डिग्‍गेवाडीच्‍या शांतीस्‍थळी बंजारा ग्रंथ, आभूषणाची पालखीतून भव्‍य मिरवणूक काढण्‍यात येणार आहे. त्‍याचबरोबर सांस्‍कृतिक कार्यक्रम, व्‍याख्‍यान अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. तसेच बंजारा साहित्‍यावर चर्चासत्र होणार असून या चर्चासत्रासाठी देशभरातील बंजारा साहित्यिक, लेखक उपस्थित राहणार आहेत. पुस्‍तक प्रदर्शन व विक्री, बंजारा आभूषण प्रदर्शन कार्यकमाचे वैशिष्‍ट्य राहतील.
    देशभरात सर्व भागात विखुरलेला बंजारा समाज संस्‍कृती परंपरा, वेशभूषा, बोलीभाषा, तांडा पध्‍दती त्‍यातूनच स्‍वतःची ओळख निर्माण केलेली आहे. यामुळे नेहमीच एकमेकांशी जोडला गेलेला आहे. देशभरात सांस्‍कृतिकदृष्‍टया एक असलेला समाज, देशातील विविध प्रांतात कमी अधिक प्रमाणात असल्‍यामुळे राष्‍ट्रीय स्‍तरावर संघटीत राहिला नाही. व्‍यापार करणा-या या समाजाला इंग्रजांनी उखडून टाकल्‍याचे सर्वश्रूत आहे. दोनशे वर्षाहून अधिक काळ मुख्‍य प्रवाहापासून दूर राहिल्‍याने शिक्षण मिळाले नाही. त्‍यामुळे लिखित इतिहास निर्मिती म्‍हणावी तशी करता आली नाही.
    बंजारा समाजाकडे आदर्श विस्‍तृत असे साहित्‍य बंजारा संस्‍कृती, परंपराबाबत मार्गदर्शन ग्रंथ असावा. जाती, पोटजाती, सण उत्‍सव कळावेत, समाजाचे सातत्‍याने जागृती, प्रबोधन व्‍हावे, समाजाचा भविष्‍यकाळ उज्‍वल करण्‍यासाठी पोषक वातावरण तयार करावे, या हेतूने बंजारा साहित्‍य संमेलनाच्‍या व्‍यासपीठावरुन चर्चा करुन इतिहास, संस्‍कृती समजावून घेऊन समाजाला सांस्‍कृतिक समृध्‍द करण्‍याचा आमचा प्रयत्‍न  आहे. यामुळे समाजाचा इतिहास नवीन पिढीला अधिक चांगल्‍याप्रकारे समजेल व समाजाची जडणघडण होईल, असे मत राठोड यांनी बोलताना सांगितले.


* देशातील 265 संशोधक, लेखक, साहित्यिकांचा पुरस्‍कार व मानपत्राने सन्‍मान 
* मिरवणूक, साहित्‍य दिंडी, आभूषण, पुस्‍तके प्रदर्शन व विक्री 
* चाळीसहून अधिक नवीन पुस्‍तके, सीडीचे प्रकाशन 
* श्रीमती रत्‍नाबाई राठोड यांची साखर तुला
* प्रा. मोतीराज राठोड यांची ग्रंथ तुला
* जेष्‍ठ बंजारा समाजसेवक चंद्राम चव्‍हाण यांचा जीवनगौरव पुरस्‍काराने सन्‍मान
* सर्व साहित्यिकांची बंजारा थाटात शाही मिरवणूक
 
Top