बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: पिंपळवाडी (ता. बार्शी) येथील पाझर तलावालगत अनाधिकृत खोदलेल्‍या विहीरी बुजविण्‍याची मागणी सरपंच व ग्रामस्‍थांनी जिल्‍हाधिकारी व तहसिलदार यांच्‍याकडे केली आहे.
    मौजे उकडगाव येथील सदरच्‍या पाझर तलावातील भरावाच्‍या आतील बुडीत क्षेत्रात गट नं. 89 मध्‍ये नवनाथ राजाराम मुंऐ यांची विहीर आहे. गट नं. 88 मध्‍ये भरावाच्‍या 57 मीटरवर दत्‍तू मारती मुंढे यांची विहीर आहे. गट नं 129/140/क/1/4 मध्‍ये भरावाच्‍या 65 मीटरवर जयंत सुरेश मुळे यांची विहीर आहे.
    रोजगार हमी योजनेतून पूर्ण केलेल्‍या पिंपळवाडी पाझर तलावाचे हस्‍तांतरण ग्रामपंचायतीकडे दि. 10 जानेवारी 2007 मध्‍ये शासनाच्‍या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्‍या पत्रानुसार झाले आहे. संपादित क्षेत्रात तसेच तलावाच्‍या भरावापासून दोनशे मीटरपर्यंत विहीर खोदता येत नाही अथवा स्‍फोटकांचाही वापर करता येत नाही. शासनाच्‍या परिपत्रकानुसार साठवण क्षेत्राच्‍या बांधाच्‍या टोकापासून शंभर मीअर बांधाच्‍या उंचीच्‍या दहा पट-यातील अधिक असलेल्‍या अंतरात माती, मुरुम काढणे, खड्डे घेणे याला निकष आहेत.
    सदरच्‍या शेतक-यांनी स्‍फोटकांचा वापर करुन खोदकाम केल्‍याने तलावाच्‍या भरावाला क्षती पोहोचत आहे. याचा परिणाम होत तलावातील पाणीसाठा टिकून राहत नाही. ग्रामपंचायतीने यापूर्वी अनेकवेळा शासनाच्‍या विविध विभागातील दिलेल्‍या तक्रारीची दखल घेतली नाही याउलट त्‍या शेतक-यांकडून अरेरावी हो असल्‍याने सदरच्‍या बेकायदा घेतलेल्‍या विहीरी बुजविण्‍यात याव्‍यात, अशी तक्रार सरपंच व ग्रामस्‍थांनी बार्शी तहसिलदार व जिल्‍हाधिकारी यांच्‍याकडे केली आहे.
    या ठिकाणी पूर्वीच्‍या तक्रारीवरुन विद्युत विभागाकडे सूचित करुन सदरच्‍या विहीरींचे विद्युत कनेक्‍शन बंद करण्‍याचे आदेश तहसिल विभागाकडून देण्‍यात आले होते. त्‍याप्रमाणे सदरचे कनेक्‍शन बंद केल्‍याचा अहवाल विद्युत विभागाकडून देण्‍यात आला आहे.
    सदरच्‍या प्रकाराबाबत बार्शीचे तहसिलदार यांनी तक्रारदार व विहीर मालक यांना बोलावून सविस्‍तर चर्चा केली. सदरच्‍या घटनेबाबत ग्रामस्‍थांची ग्रामसभा घेऊन यावर विचारविनियम करावा, असे मत यावेळी अभियंता पांडव यांनी व्‍यक्‍त केले. त्‍यानुसार ग्रामसेवकांना सूचना देत ग्रामसभेचे नियोजन करावे आणि या विषयाला अनुसरुन असलेल्‍या तज्ञांना या सभेवेळी उपस्थित करावे, अशा सूचना देण्‍यात आल्‍या. ग्रामसभेच्‍या वेळी होणारे ठराव संबंधित सचिवांच्‍यामार्फत बार्शी तहसिलकडे येतील व ते तसेच जिल्‍हाधिकारी कार्यालयात पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्‍यात येतील, असे तक्रारदारांना तहसिलदार बालाजी सोमवंशी यांनी सांगितले.
 
Top