मुंबई -: दोन वर्षापूर्वी झालेला जनगणेचा अहवाल जाहीर झाला असून त्‍यानुसार राज्‍याची लोकसंख्‍या 2011 मध्‍ये 11 कोटी 23 लाख 74 हजार 333 एवढी नोंदली गेली असून लोकसंख्‍येच्‍या बाबतीत महाराष्‍ट्र देशात दुस-या क्रमांकाचे राज्‍य ठरले आहे. राज्‍याच्‍या 2011 च्‍या जनगणनेच्‍या संक्षिप्‍त प्राथमिक जनगणना माहिती मुख्‍य सचिव जयंत बांठिया यांच्‍या हस्‍ते गुरुवारी मंत्रालयात प्रसिध्‍द करण्‍यात आली. त्‍यानुसार ठाणे जिल्‍ह्याची लोकसंख्‍या सर्वाधिक म्‍हणजे 1 कोटी 10 लाख 60 हजार 148  (9.84 टक्‍के)इतकी आहे तर सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात सर्वात कमी म्‍हणजे 8 लाख 49 हजार 651 (0.76 टक्‍के) इतकी आहे.
    लोकसंख्‍येच्‍या बाबतीत ठाण्‍यानंतर पुणे आणि मुंबई उपनगराचा क्रमांक लागतो. राज्‍याची शहरी लोकसंख्‍या 42.4 टक्‍क्‍यांवरुन 45.2 टक्‍के इतकी झाली आहे. 2001-2011 या कालावधीत राज्‍याच्‍या लोकसंख्‍येत 15.99 टक्‍के एवढी वाढ झाल्‍याचे दिसते. राज्‍याच्‍या लोकसंख्‍येमध्‍ये 5 कोटी 82 लाख 43 हजार 56 पुरुष इतर 5 कोटी 41 लाख 31 हजार 277 इतक्‍या महिला आहेत. पुरुषांच्‍या लोकसंख्‍येत 15.56 टक्‍के तर स्त्रियांच्‍या संख्‍येत 16.47 टक्‍के वाढ झाली आहे. दर हजारी मुलांच्‍या तुलनेत मुलींची संख्‍या 929 इतकी असल्‍याचे दिसून येते.
 
Top