बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : ज्‍या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्‍वराज्‍यासाठी सर्वांना सुरक्षित रयतेचे राज्‍य स्‍थापन केले, त्‍यांचा वारसा घेत त्‍यांच्‍यापेक्षा एक पाऊल पुढे जात धर्मवीर संभाजी महाराजांचे कार्य होते. इतिहासातील अत्‍यंत चांगली कारकीर्द असतानाही उशीराने मागील दहा ते पंधरा वर्षात आपल्‍यासमोर खरा इतिहास येऊ लागल्‍याचे मत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी व्‍यक्‍त केले.
    शिवराज्‍य सेनेच्‍यावतीने आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मध्‍यवर्ती जयंती उत्‍सवप्रसंगी कसबा पेठेतील बेदराई चौकात ते बोलत होते. यावेळी प्रा. शिवाजी सावंत, जेष्‍ठ कामगार नेते तानाजी ठोंबरे, वायुपुत्र नारायण जगदाळे, श्रीकांत डांगे, उद्योजक सुभाष डिडवळ, रावसाहेब मनगिरे, नगरसेवक दिपक राऊत, लहू चव्‍हाण, बाळासाहेब गव्‍हाणे, अँड. प्रविण करंजकर, नागेश दुधाळ, नाना वाणी, शिरीष जाधव आदी मान्‍यवर उपस्थित होते.
    पुढे बोलताना राऊत म्‍हणाले की, शिवाजी महाराजांनी गनिमी कावा करुन लढाया लढल्‍या तर धर्मवीर आमने सामने 200 लढायात एकदाही तह केला नाही व एकही लढाईत हार पत्‍करली नाही. धर्माचे रक्षण करत एक चांगला आदर्श निर्माण करणारे धर्मवीर संभाजी महाराज होते. शेतक-यांचा ऊस बांधावर वाळत असताना प्रा. शिवाजी सावंत यांनी साखर कारखान्‍याच्‍या स्‍वरुपात ख-या अर्थाने शेतक-यांचे पुण्‍य वाटून घेतले. ऊस हे शेतक-यांचे जिव्‍हाळ्याचे पिक असून ढसढसा रडत असलेल्‍या शेतक-यांचे अश्रू पुसत भैरवनाथची दुसरी शाखा, विहाळ, मंगळवेढा इत्‍यादी चार ठिकाणी शाखा सुरु केल्‍या व शेतक-यांच्‍या मुलांच्‍या नोकरीचाही प्रश्‍न काही अंशी सोडविला. जयवंत मल्टिस्‍टेट को ऑपरेटिव्‍हची शाखा पुढील आठवड्यात बार्शीत सूरु होत असून त्‍याचा ग्रामीण भागातील शेतक-यांना लाभ होणार आहे.
    यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्‍लेखनीय कामगिरी करणा-या व्‍यक्‍तींना शिवगौरव पुरस्‍कार देऊन गौरविण्‍यात आले. साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल रामचंद्र इकारे, पत्रकारिता क्षेत्रासाठी सचिन आपसिंगकर, शिवचरित्राचे अभ्‍यासक कृष्‍णाथ पाटील व उद्योजक विकास भालके यांना शाल, फेटा व छत्रपती शंभूराजे यांची आकर्षक प्रतिकृती देवून सन्‍मानित करण्‍यात आले.
    सत्‍कारानंतर स्‍पर्श क्रियेटीव्‍ह प्रस्‍तुत झी मराठी फेम जागर माय मराठीचा हा मराठमोळ्या इतिहासाचा साक्षात्‍कार करुन देणारा, अंगावर रोमांच आणणारा कार्यक्रम झाला. यामध्‍ये काठी, तलवार टेंभे यांचे प्रदर्शन, वासुदेवाचे गीत, घनश्‍याम सुंदरा, पोवाडे, दिंडी चालली, कलाकाराने अटल बिहारी, राणे, शरद पवार, आठवले, राज ठाकरे, आण्‍णा हजारे, उज्‍वल निकम यांचे विविध आवाज काढत कार्यक्रमात रंगत आणली. रायगडाचे वारकरी म्‍हणून ओळख असलेल्‍या कृष्‍णाथ पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वॉस्‍को येथील संग्रहालयातील चित्र दाखवून त्‍याची वैशिष्‍टये सांगितली.
 
Top