आगामी होणा-या निवडणुकीबाबत आतापासूनच राजकीय वर्तुळात 'फिल्‍डींग' लावून उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात नियोजन केले जात असल्‍याचे चित्र पहावयास मिळत आहे. ‘निवडणुका’ हा सर्वांच्‍याच चर्चेचा विषय बनला आहे. अजूनतरी निवडणुकीबाबत दिल्‍लीपासून ते गल्‍लीपर्यंत मोठ्या चवीने  चर्चेला उधान आले असले तरी होवू घातलेल्‍या निवडणुका सन 2014 मध्‍ये होणार आहेत. सामान्‍य माणूस ह्या चर्चेत फारसा दिसत नाही. पण सुशिक्षित बेरोजगार, राजकीय कार्यकर्ते, जिल्‍ह्याच्‍या व तालुक्‍याच्‍या कारभारात लूडबूड करणारे बगलबच्‍चे आणि खेड्या-पाड्यातील, वाड्या-वस्‍तीमधील
गावच्‍या पारावर बसून चर्चा करणारे उत्‍साही कार्यकर्ते हे या निवडणुक चर्चेला महत्‍त्‍व देवून राज्‍यात युतीचे का? आघाडीचे सरकार येणार? युतीमध्‍ये कोण कोण असणार? कुणा-कुणाची मनधरणी करावी लागणार? सत्‍ताधारी कॉंग्रेस व राष्‍ट्रवादीचे सरकार पुन्‍हा सत्‍तेत येईल का? यासह अनेक विषयावर चर्चेला उधाण आले आहे.
     एकीकडे दुष्‍काळाने सर्वसामान्‍य जनता होरपळत असताना दुष्‍काळगस्‍तांना मदत करण्‍याच्‍या नावाखाली काही राजकीय पक्षाच्‍या नेत्‍यानी पाण्‍याच्‍या टाक्‍यांचे वाटप केले. तर कधी न्‍व्‍हे ते सामुदायिक विवाह सोहळे घडवून आणले. त्‍याचबरोबर काहीनी उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील प्रत्‍येक तालुक्‍याला रूग्‍णवाहिकाही वाटप केली आहे. कसल्‍याही साहित्‍याचा गंध नसणा-या उद्योगी नेत्‍यानी साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष म्‍हणून मिरवताना दिसून आले. यापैकी काही नेते कधी शिवसेना तर कधी राष्‍ट्रवादी नेत्‍यांच्‍या संपर्कात राहून मी तुमचाच आहे आणि लोकसभा निवडणुकीत उभा राहण्‍यासाठी हे समाजसेवेचे वृत्‍त तात्‍पुरते हाती घेतले असल्‍याची माहिती त्‍यांच्‍या वागणुकीतून स्‍पष्‍ट होत आहे. कालपरवा पर्यंत राजेंद्र मिरगणे (बार्शी) हे नाव तसे खुप कमी लोकांना परिचित होते. पण आता उस्‍मानाबाद जिल्‍हा लोकसभा मतदार संघातील किल्‍लारी पासून करमाळा तालुक्‍याच्‍या बॉर्डरपर्यंत त्‍यांच्‍या सामाजिक कार्याने जनतेमध्‍ये चांगलचा ठसा उमटविला असल्‍याचे दिसत आहे. एकीकडे शिवसेना पक्षांच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांशी त्‍यांचे सलोख्‍याचे संबंध आहेत. तर दुसरीकडे राजेंद्र मिरगणे हे राष्‍ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे निकटवृतीय मानले जातात. राष्‍ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांना डावलून इतरांना उमेदवारी पक्षश्रेष्‍ठी देईल काय? याबाबतही आतापासूनच तर्कवितर्क लढविले जात आहे.
      उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात शिवसेना पक्षाची म्‍हणावी तितकी ताकत सध्‍याच्‍या राजकीय वर्तुळात दिसून येत नाही. कारण जिल्‍ह्यात विरोधी पक्ष म्‍हणून त्‍यानी सत्‍ताधारी मंडळीवर वचक ठेवला नाही. तर कॉंग्रेसला सोबत घेवून जिल्‍हापरिषद व जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक ताब्‍यात घेतली. या कृत्‍यामुळे वाढत्‍या प्रभावाला लगाम घातल्‍याचे आणि जिल्‍ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्‍या जिल्‍हापरिषद ही कॉंग्रेस व शिवसेना यांच्‍या ताब्‍यात असली तरी म्‍हणावी तेवढी विकास कामे झाली नसल्‍याचे जाणकारातून बोलले जात आहे. त्‍याचबरोबर दुष्‍काळी कामाबाबत शासकीय यंत्रणा जिल्‍ह्यात उदासिनच असल्‍याची चर्चा होत आहे.
       साखर कारखाना उभारणीच्‍या निमित्‍ताने पश्चिम महाराष्‍ट्रात सोलापूर जिल्‍ह्यातील वाळाव (ता. माढा) येथील मुळचे रहिवाशी असणारे प्राध्‍यापक सावंत बंधू राष्‍ट्रवादीचे कार्यकर्ते होते. त्‍या भागात शिक्षण सम्राट म्‍हणून त्‍यांची मोठी ख्‍याती आहे. सोलापूर जिल्‍ह्यात सावंत बंधूची दाळ न शिजल्‍याने ते मराठवाड्यातील उस्‍मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथील सोनारी येथे भैरवनाथ शुगर प्रा.लि. च्‍या माध्‍यमातून शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्‍वर पाटील यांच्‍या आश्रयाखाली स्थिरावल्‍याचे सर्वश्रूत आहे. पण त्‍यांनी साखर कारखाना हे त्‍यांच्‍या राजकीय कारकिर्दीचे पहिले पाऊल अत्‍यंत कुशल व चातुर्याने टाकले. परजिल्‍ह्यातील माणसाला सोनारी परिसरातील जनतेने शिवसेनेचा उमेदवार म्‍हणून जिल्‍हापरिषद निवडणुकीत निवडून दिले. ज्ञानेश्‍वर पाटील यांनी आपले राजकीय चातुर्य वापरुन सावंत यांना अर्थ व बांधकाम सभापती हे पद मिळवून दिल्‍याचे बोलले जात आहे. त्‍यामुळेच आज सावंत बंधूना विधानसभा व लोकसभेची स्‍वप्‍न पडत आहेत. त्‍यानीही अनेक गावात पाण्‍याच्‍या टाक्‍या वाटप केल्‍या. सामुदायिक विवाह सोहळे लावले. कारखाना परिसरात भजन किर्तनाचे कार्यक्रम घेत आहेत. जनतेची सहानुभूती मिळवण्‍यासाठी व येऊ घातलेल्‍या निवडणुकांना सामोरे जाण्‍याच्‍या पूर्व तयारीसाठी सावंत बंधू ज्ञानेश्‍वर पाटील यांच्‍या प्रेरणेने जोमाने कार्य करताना दिसत आहेत. शंकरराव बोरकर यांनाही त्‍यांचा बंद पडलेला कारखाना भाडेतत्‍त्‍वावर चालवण्‍यास घेवून सावंत बंधूनी आधारच दिल्‍याची कार्यकर्त्‍यात जोरदार चर्चा रंगत आहे. म्‍हणून सध्‍या बोरकर हे सावंत बंधूच्‍याच बाजूचे असल्‍याचे  बोलले जात आहे.
       जिल्‍ह्यातील भारतीय जनता पक्ष म्‍हणावा तेवढा प्रबळ नसला तरीही लोकमंगल उद्योग समुहाचे अध्‍यक्ष तथा माजी खासदार सुभाष देशमुख व युवक कार्यकर्ते रोहन देशमुख यानी काही भागात भाजपचे वर्चस्‍व निर्माण करताना दिसत आहे. सुभाष देशमुख हेही निवडणुक लढविणार यात शंका नाही. जिल्‍ह्यात तिसरी आघाडी अस्तित्‍वातच नाही. जनता दल हे फक्‍त वर्तमान पत्रातून प्रसिध्‍दी देवूनच टिकून आहे. प्रकाश आंबेडकर यांच्‍याकडे जाण्‍यासाठी सध्‍यातरी जिल्‍ह्यात कार्यकर्तेच शिल्‍लक नसल्‍याचीही रंगतदार चर्चा होत आहे.
      भूम-परंडा-वाशी या विधानसभा मतदार संघात परंडा तालुक्‍यातच शिवसेनेचे वर्चस्‍व जाणवते. पण वाशी व भूम या ठिकाणी सत्‍ताधारी राष्‍ट्रवादीचे आमदार राहुल मोटे यांचे वर्चस्‍व सध्‍यातरी जाणवत आहे. पण त्‍यांनी मागील निवडणुकात दिलेली अनेक आश्‍वासनाची पूर्तता न केल्‍यामुळे त्‍यांच्‍याबद्दल जनतेत नाराजी आहे. त्‍यातूनच भूम तालुक्‍यातील हाडोंग्री येथील कॉंग्रेसचे बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर हेही विविध सामाजिक कामामुळे व त्‍यांच्‍या कार्यकर्त्‍यांच्‍या आग्रहामुळे विधानसभा निवडणुक लढविण्‍याच्‍या तयारी करीत आहेत.
      राज्‍याचे पशुसंवर्धन, दुग्‍धविकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा उस्‍मानाबाद जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण हे दुष्‍काळग्रस्‍त परिस्थितीवर मात करण्‍यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. ते जिल्‍ह्यात सर्वत्र दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेत वेळोवेळी शासकीय यंत्रणेला मार्गदर्शक सूचना करीत आहेत. ना. चव्‍हाण यांनी सातत्‍याने शासन दरबारी झगडून अनेक विकास योजना राबविल्‍याचे सर्वश्रूत आहे. त्‍यांच्‍या कार्याबद्दल दस्‍तुरखुद्द मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण यानी तुळजापूरच्‍या जाहीर सभेत कौतुक करुन मधुकरराव चव्‍हाण हे जनतेच्‍या समस्‍या व विकासासाठी मोठी धडपड करीत असल्‍याचे सांगितले. मराठवाड्याच्‍या विकासामध्‍ये सिंहाचा वाटा म्‍हणून मधुकरराव चव्‍हाण यांचा उल्‍लेख केला जातो. ना. मधुकरराव चव्‍हाण हे विकासाभिमुक्‍त नेते आहेत. तुळजापूर तालुक्‍यात रस्‍ते, पाणी, वीज, आदी मुख्‍य सुविधा देण्‍यावर त्‍यांचा भर असल्‍यामुळे ते जनतेत लोकप्रिय नेते म्‍हणून ओळखले जातात.
      राष्‍ट्रवादीचे खा. डॉ. पद्मसिंह पाटील हे यापूर्वी मंत्रीमंडळात होते. उजनीचे पाणी, रेल्‍वे यासह अनेक प्रश्‍नावर त्‍यानी यशस्‍वीपणे कार्य केले. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी देखील स्‍वतःची राजकीय ओळख आपल्‍या कार्यातून दाखविली आहे.  सध्‍या तेही जिल्‍हाभरात सर्वत्र दुष्‍काळ प्रश्‍नावर पाहणी दौरा करीत आहेत. विविध सामाजिक व राजकीय कार्यक्रमाना उपस्थिती लावताना दिसत आहेत. सामुदायिक विवाह सोहळा, दुष्‍काळामध्‍ये छावणी उभारणे, पाण्‍याच्‍या टाक्‍यांचे वाटप आदी प्रश्‍नावर राष्‍ट्रवादी पक्षाचे जिल्‍ह्यात जोरदार काम चालू आहे. शिवसेनेकडून लोकसभेची उमेदवारी कोणालाही मिळाले तरी उमेदवाराला जिल्‍ह्यातील सर्व निष्‍ठावन शिवसैनिक मनापासून सहकार्य करतील.
        आ. बसवराज पाटील यांचा मतदार संघ आरक्षित असल्‍यामुळे त्‍यांचे संपूर्ण लक्ष औसा (जि. लातूर) येथेच आहे. मुरुम नगरपरिषदेत एकहाती सत्‍ता व विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना स्‍वतःकडे ठेवून चांगल्‍याप्रकारे चालवला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखान्‍याचे चेअरमन अरविंद गोरे यानी कारखान्‍याच्‍या माध्‍यमातून सर्वत्र यशस्‍वी म्‍हणून नाव लौकीक मिळविले आहे. ते निवडणुकीची तयारी करीत असल्‍याचे बोलले जात आहे.
        सावंत बंधू, माजी आ. ज्ञानेश्वर पाटील, माजी आ. प्रा. रविंद्र गायकवाड, आ. ज्ञानराज चौगुले, माजी खा. कल्‍पना नरहिरे, उद्योजक शंकरराव बोरकर, राजेंद्र मिरगणे, आ. ओमराजे निंबाळकर आदी निष्‍ठावन शिवसैनिकांना जनतेसमोर विकास कामाचा नवीन आराखडा ठेवावा लागेल. सामान्‍य माणूस सध्‍या महागाईने होरपळून गेला आहे. त्‍याला पर्याय द्यावा लागेल. शेतकरी वर्गाला आशादायक चित्र निर्माण करुन द्यावे लागेल. शिक्षण, आरोग्‍य या सोयी सुविधांबात व इतर ज्‍वलंत प्रश्‍नाबाबत, उपाययोजनाबाबत ठोस कार्यक्रम हाती घेतल्‍यास जिल्‍ह्यात सत्‍तांतर होण्‍यास वेळ लागणार नाही, असे जाणकारातून बोलले जात आहे.
       निवडणुका तोंडावर आल्‍या की शेतक-यांच्‍या कापसाला, ऊसाला हमी भाव देण्‍याचे राजकारण, घोषणाबाजी, कर्जमाफीचे आमिष दाखवून निवडणुका जिंकायच्‍या, गोर-गरीब कष्‍टकरी सामान्‍य माणांच्‍या भावनांचा खेळ मांडायचा, पुन्‍हा निवडून आले सत्‍ता मिळाली की, पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडणार, कडधान्‍य, दाळी, ज्‍वारी, गहू व्‍यापारी स्‍वतास्‍त घेणार शेतक-यांची पिळवणूक करणार, सहाव्‍या वेतन आयोगाने मस्‍तवाल झालेले नोकरदार पुन्‍हापुन्‍हा सत्‍ताधारी मंडळीनाच निवडून देण्‍यासाठी धडपडणार?
            शिक्षण, आरोग्‍य, रस्‍ते, पाणी, वीज हे अजूनही ग्रामीण भागाचे मुलभूत प्रश्‍न जनतेसमोर उभे आहेत. त्‍यांना आशा आहे की, आपण निवडून दिलेला माणूस कधीतरी आमचे प्रश्‍न कायमस्‍वरुपी सोडवून आम्‍हाला या अंधारातून प्रकाशाकडे घेवून जाईल. आम्‍ही ज्‍या शेतात राबतो, काबाडकष्‍ट करतो, धान्‍य पिकवतो त्‍याला हमीभाव देण्‍यासाठी बाजारपेठ, उपलब्‍ध करुन देईल, ऊसाला हमीभाव देण्‍यासाठी शासन दरबारी शेतक-यांची बाजू मांडेल? शेतकरी, कष्‍टकरी, बहुजनांना हवं ते शिक्षण तालुक्‍यात, जिल्‍ह्यात मोफत व सक्‍तीचे मिळवून देण्‍यासाठी प्रयत्‍न करणा-या व धडपणा-या, जनतेसाठी झगडणा-या, निस्‍वार्थीपणे जनसेवा करणा-या उमेदवारांनाच जनता आता थारा देईल अन्‍यथा जनताही रुद्र अवतार धारण करुन निष्‍क्रीय ठरलेल्‍यांना त्‍यांची जागा येऊ घातलेल्‍या निवडणुकीत दाखविल्‍याशिवाय राहणार आहे, अशी चर्चा सध्‍यातरी रंगत आहे.

* शिवाजी नाईक 
संपादक - तुळजापूर लाईव्‍ह

 
Top