नळदुर्ग -: गुरुवार रोजी शांतीस्‍थळ अक्‍कलकोट येथे बंजारा साहित्‍य परिषदेच्‍या निमित्‍ताने विविध विषयांवर तज्ञांचे व्‍याख्‍यान होणार असून शुक्रवार रोजी बंजारा समाजाच्‍या विविध मागण्‍यांचे निवेदन शासनास आयोजित साहित्‍य संमेलनाचे औचित्‍य साधून देण्‍यात येणार आहे. या संमेलनासाठी उपस्थित राहण्‍याचे आवाहन राष्‍ट्रीय बंजारा परिषदेचे अध्‍यक्ष किसनराव राठोड यांनी केले आहे.
      गुरुवार दि. 6 जून रोजी प्रमुख मान्‍यवरांचे पुढीलप्रमाणे व्‍याख्‍यान होणार आहे. बंजारा समाजाचा इतिहास, बंजारा संस्‍कृती रिती-रिवाज व परंपरा, बंजारा लोकसाहित्‍य, बंजारा लोकगितामध्‍ये स्‍त्री जीवन, बंजारा धार्मिक केंद्राद्वारे सामाजिक विकास व प्रबोधन, संत सेवालाल महाराजांचे विचार, बंजारा आरक्षण आदी विषयावर अनुक्रमे भीमणीपुत्र नाईक, मारतीया भुकीया, डॉ. भाऊसाहेब राठोड, सी.के. पवार (मुंबई), डॉ. भावना राठोड (मुंबई), रामराव भाटेगावकर (मराठवाडा), प्रा. ग.ह. राठोड, प्रा. सी.के. पवार (मुंबई), प्रा. रमेश राठोड (विदर्भ) या ज्‍येष्‍ठ साहित्यिक व विचारवंतांचे व्‍याख्‍यान होणार आहे. तर कवी दिलराज बंजारा, मांगीलाल राठोड, मेहरसिंग पवार, सौ. मालिनी पवार यांचेही प्रबोधनात्‍मक काव्‍य वाचन होणार आहे.
     बंजारा भटक्‍या विमुक्‍त समाजांना अनुसुचित जाती-जमाती मध्‍ये समाविष्‍ट करण्‍याची शिफारस केंद्र सरकारला करण्‍यात यावी व सदर मागणीच्‍या मंजुरीसाठी पुढाकार घ्‍यावा, परभणी कृषी विद्यापीठाचे वसंतराव नाईक नामकरण करण्‍यात यावे व जन्‍मशताब्‍दी वर्ष निधीच्‍या खर्चासाठी पुढील एक वर्ष मुदतवाढ द्यावी, महाराष्‍ट्र शासनाने राखीव ठेवलेल्‍या शंभर कोटी रुपये निधीतून प्रत्‍येक जिल्‍ह्यात बंजारा सांस्‍कृतिक भवन निर्माण करणे, बंजारा साहित्‍य, लिखाणाला प्रोत्‍साहन द्यावे, क्षेत्रबंधन मर्यादा उठवण्‍याच्‍या बिलामध्‍ये दुरूस्‍तीसाठी याबाबतीत मागण्‍या लोकसभा अधिवेशनामध्‍ये होणा-या चर्चेत महाराष्‍ट्रातील खासदारांनी पुढाकार घेण्‍याबाबत व्हिप काढावा व क्षेत्रबंधन मर्यादा रद्द करावी, बंजारा भाषेला आठव्‍या सूचीत समाविष्‍ट करावे, गून्‍हेगार जमाती कायदा पूर्णतः रद्द करुन मुळ भटक्‍यांना अॅट्रॉसिटी अॅक्‍टचा लाभ मिळावा, बंजारा विमुक्‍त भटकेकरीता लोकसंख्‍येच्‍या प्रमाणात अर्थसंकल्‍पात निधीची तरतूद करणे, भटक्‍या विमुक्‍तांना लावलेली क्रिमीलेअरची अट रद्द करण्‍यात यावी, बंजारा भटक्‍या विमुक्‍तांना जातीचा दाखला देत असताना 1961 च्‍या अगोदरची रहिवास पुरावा जाचक अट रद्द करण्‍यात यावी, दलीत वस्‍ती योजनेप्रमाणे तांडा वस्‍ती योजना अंतर्गत 500 लोकसंख्‍या असलेल्‍या प्रत्‍येक तांड्यासाठी वीस लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्‍यात यावी, बंजारा वस्‍तीला महसूली गावाचा दर्जा मिळावा व बंजारा तांडे असलेली जमीन तांड्याच्‍या मालकीची करावी, कर्नाटक राज्‍याप्रमाणे महाराष्‍ट्रात तांडा विकास महामंडळ स्‍थापन करावे व अध्‍यक्षपदाला राज्‍यमंत्री दर्जा द्यावा, बंजारा तांडा वस्‍ती योजना शहरी भागातही लागू करण्‍यात यावी, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्‍हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका, बंजारा विमुक्‍त भटके यांना लोकसंख्‍येच्‍या प्रमाणात राजकीय आरक्षण मिळावे, बंजारा दैवत व धर्मगुरु संत सेवालाल महाराज यांची जयंती शासकीय सुट्टी जाहीर करुन अभ्‍यासक्रमात संत सेवालाल महाराजांच्‍या विचारांचा समावेश करावा, वसंतराव नाईक महामंडळाचे अध्‍यक्षपद बंजारा समाजाला द्यावे, विमुक्‍त जाती व भटक्‍या प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना प्राथमिक शिक्षणापासून तर उच्‍च शिक्षणापर्यंतचे सर्व शिक्षण मोफत मिळावे, नवीन आश्रमशाळा शहरांमधून इंग्रजी मिडियम मध्‍ये सुरु करण्‍यात यावी, उत्‍कृष्‍ट आश्रमशाळांना शैक्षणिक गुणवत्‍ता वाढविण्‍यासाठी प्रोत्‍साहन मिळावे, बंजारा धार्मिक स्‍थळांना तिर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, आदी विषयावर बंजारा समाजाच्‍या वतीने शासनास निवेदन देण्‍यात येणार आहे. इच्‍छुक लेखक, साहित्यिक, कवी यांनी राष्‍ट्रीय बंजारा परिषद शांतीस्‍थळ अक्‍कलकोट, जि. सोलापूर येथे संपर्क साधण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.
 
Top