पंढरपूर -: छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या 340 व्‍या राज्‍यभिषेक सोहळ्याचे आयोजन रायगड येथे प्रतिवर्षाप्रमाणे करण्‍यात आले असून यावर्षी राज्‍याभिषकेसाठी चंद्रभागेचे पाणी नेण्‍यात येणार असल्‍याची माहिती अखिल भारतीय शिवराज्‍याभिषेक महोत्‍सव समिती, दुर्गराज रायगडचे सदस्‍य अमरजित पाटील यांनी दिली.
    शिवराज्‍य‍ाभिषेक सोहळ्यासाठी युवराज छत्रपती संभाजीराजे 5 जून रोजी शिवभक्‍तांसोबत पायी रायगड चढण्‍यास सुरुवात करणार आहेत. यंदा प्रथमच चंद्रभागा नदीचे पाणी शिवराज्‍याभिषेकासाठी नेण्‍यात येणार आहे.
    दि. 5 जून रोजी दुपारी साडे बारा वाजता नगारखाना, राजसभा परिसरात गडपूजन करुन शिवराज्‍याभिषेक सोहळ्यास सुरुवात होणार आहे. त्‍यानंतर त्‍याच ठिकाणी शिवकालीन मर्दानी युध्‍दकलेची प्रात्‍याक्षिके होणार आहेत. सायंकाळी साडे पाच वाजता राजसदर या ठिकाणी शाहिरी जलशाचा कार्यक्रम होणार आहे. साडे सहा वाजता विविध सांस्‍कृतिक कार्यक्रम होतील. त्‍यानंतर सात वाजता शिवछत्रपतींच्‍या जीवनावरील विविध पुस्‍तकांचे प्रकाशन होईल. साडे सात वाजता ऐतिहासिक कार्यक्रमाला सुरुवात होईल. रात्री आठ वाजता अन्‍नछत्राचे उदघाटन होईल. त्‍यानंतर साडे आठ वाजता गडदेवता शिरकाईदेवी व तुळजाभवानी देवीच्‍या गोंधळाचा पारंपारिक कार्यक्रम शिरकाई मंदीर येथे होईल व रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत शाहिरी व सांस्‍क‍ृतिक कार्यक्रम राजसदर येथे पार पडतील.
    दि. 6 जून हा शिवराज्‍याभिषेकाचा मुख्‍य दिवस आहे. या दिवशी पहाटे साडे पाच वाजता नगारखान्‍यासमोरील ध्‍वजस्‍तंभावर स्‍वराज्‍याच्‍या भगव्‍या ध्‍वजाचे आरोहण करण्‍यात येईल. सकाळी सहा वाजता राजसदर येथील कार्यक्रमांना सुरुवात करण्‍यात येईल. आठ वाजता राजसदर येथे शाहिरी मुज-याचा कार्यक्रम पार पडेल. त्‍यानंतर दहा वाजता छत्रपती शिवरायांच्‍या उत्‍सवमूर्तीवर युवराज संभाजीराजे व प्रमुख मान्‍यवरांच्‍या हस्‍ते अभिषेक संपन्‍न होईल. सकाळी दहा वाजून वीस मिनिटानी मेघडंबरीतील सिंहासनाधिष्ठित शिवरायांच्‍या मूर्तीस संभाजीराजे यांच्‍या हस्‍ते सुवर्ण नाण्‍याचा अभिषेक होवून पुष्‍पहार अर्पण करण्‍यात येईल. युवराज संभाजीराजे जमलेल्‍या शिवभक्‍तांना मार्गदर्शन करतील. त्‍यानंतर शिवरायांची पालखी जगदीश्‍वर मंदिराकडे निघेल. शिवसमाधीच्‍या दर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. यावर्षी सुमारे सत्‍तर हजार शिवभक्‍तांच्‍या जेवणाची सोय समितीच्‍यावतीने करण्‍यात आलेली आहे, असेही पाटील यांनी सांगितले आहे.
 
Top