उस्मानाबाद : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. 2012 या वर्षाकरिता दिनांक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2012 पर्यंतच्या कालावधीसाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक  यापूर्वी 30 जून 2013 असा होता. त्याला आता 15 ऑगस्ट 2013 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
            सन 2012 या कॅलेंडर वर्षात प्रसिध्द झालेले विकासविषयक लेख, विशेष वृत्त व वृत्त मालिका, वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या संदर्भात त्यांची संबंधित वर्षात प्रसिध्द झालेली  विकासविषयक छायाचित्रे यांचा विचार करण्यात येईल. जिल्ह्यातील स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत.
        पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ लिखाणाचे कात्रण त्याच्या 2 प्रतीसह पाठवावे लागेल. मूळ लिखाणाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या 2 प्रती  नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लिखाणावर लेखकाचे नाव नसल्यास, ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिद्ध झाला असेल,  त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला प्रवेशिकेबरोबर जोडलेला असावा. अन्यथा त्या प्रवेशिकेचा विचार केला जाणार नाही.
            पत्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे. या स्पर्धेविषयींची माहिती आणि अर्जाचे नमुने माहिती व जनसंपर्क  महासंचालनालयाच्या  http://dgipr.maharashtra.gov.in तसेच  महाराष्ट्र शासनाच्या   www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 
     या स्पर्धेत राज्यातील पत्रकारांनी अधिकाधिक संख्येने सहभागी   व्हावे,  असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे. 
 
Top