येरमाळा -: मध्यान्ह भोजनासाठी शाळेला सुटी झाल्यानंतर मैत्रीणीच्या घरी जेवण्यासाठी गेलेल्या एका विद्यार्थिनीचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवार दि. 25 जुलै दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कळंब तालुक्यातील शेलगाव (दि.) येथे घडली. 
     पल्लवी शिवाजी माने (13, रा. शेलगाव दिवाणे) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. यातील पल्लवी माने ही शेलगाव दिवाणे गावातीलच जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 7 वीमध्ये शिकत होती. दुपारी शाळेला सुटी झाल्यानंतर तिची मैत्रीण प्रांजली विठ्ठल दिवाणे हिच्या घरी दुपारचे जेवण करण्यासाठी गेली होती. भोजनानंतर ताट धुवून पाणी बाहेर टाकण्यासाठी दरवाज्यात गेलेल्या पल्लवीकडून पाणी विजेच्या तारेवर पडले. तार घराच्या अत्यंत जवळ असल्याने पाण्यातून विद्युत प्रवाह प्रवाहित होऊन तिला विजेचा जोरदार धक्का बसला. यात पल्लवीचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार पाहताच मैत्रीणींचाही भीतीने थरकाप झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. विद्यार्थिनींनी या घटनेची माहिती मुख्याध्यापकांना दिली.
 
Top