नळदुर्ग -: येथील सय्यद अब्‍दुलाशहा मेमोरियल उर्दु प्राथमिक व माध्‍यमिक शाळेतील शालेय पोषण आहार धान्‍य साठयाप्रकरणी संस्‍थाचालक, मुख्‍याध्‍यापक व तपासणी अधिकारी यांच्‍या  संगनमताने हा प्रकार घडला असून यातील दोषींविरूध्‍द गुन्‍हा दाखल करुन कडक कारवाई करण्‍याची मागणी  सामाजिक कार्यकर्ते सुशांत भूमकर यांनी निवेदनाद्वारे नळदुर्ग पोलीस उपनिरीक्षक यांच्‍याकडे  केली आहे.  
     निवदेनात म्‍हटले आहे की, नळदुर्ग येथील सय्यद अब्‍दुलाशहा मेमोरियल उर्दु प्राथमिक व माध्‍यमिक  शाळेमध्‍ये अनाधिकृत असा शालेय पोषण आहार साठा , शासनाचा जवळपास 8 टन तांदुळ, मिरचीपूड 250 किलो सह वटाणा, हळद, मोहरी सह शासकीय दरानुसार 1 लाख 10 हजार रुपयाचा धान्‍य  पंचायत समितीच्‍या शालेय शिक्षण विभागाकडून तपासण्‍यात आलेल्‍या अहवालात आढळून आला आहे. वास्‍तविक शाळेकडे असलेल्‍या नोंदवहीत फक्‍त 30 किलो तांदुळची नोंद असताना प्रत्‍यक्षात मात्र शाळेत  आठ टन तांदुळ सापडल्‍याने याठिकाणी मोठे काळेबेरे प्रकरण घडत आहे.  शाळेत येणा-या मुलांना भोजनासाठी म्‍हणून दिला गेलेला हा तांदुळ प्रत्‍यक्षात मुलांच्‍या पोटात न घालता मागील तीन ते चार वर्षापासून याचा साठा करण्‍यात आल्‍याचे आरोप करुन पुढे म्‍हटले आहे की, .  मिरची पावडर वरील एक्‍सपायरी डेट संपली असुन सदरील अधिका-यांनी केलेल्‍या पंचनाम्‍यात तांदुळ, मुगदाळ, तुरदाळा, मिरची पावडर, हळद, तेल, मोहरी, जिरे, मीठ, वटाणा यासह अनाधिकृत असा धान्‍य साठा बाजार भावानुसार जवळपास 2 लाख रुपये किंमतीचे  धान्‍य व साहित्‍य  बेकायदेशीर साठवणूक करुन   सर्व माल घशात घालण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे. तसेच वरील मालाचा वापर झाला, असे दाखवून इंधन व भाजीपाला यासाठी शाळेतील 469 विदयार्थ्‍यांपोटी वर्षाकाठी आलेले जवळपास 1 लाख 50 हजार रुपये निधीतही गैरप्रकार केले आहे..  ही योजना ज्‍या शाळेत राबविली जात आहे. ती व्‍य‍वस्थित राबविली जाते का? हे पाहण्‍यासाठी शासन स्‍तरावर बीडीओ व विस्‍ताराधिकारी यांच्‍या भेटी असतात. परंतु त्‍यांनी ही या सर्व बाबींकडे जाणून-बुजून कानाडोळा केल्‍याचे स्‍पष्‍ट दिसते. हा सर्व धान्‍य साठा गेल्‍या  दोन-तीन वर्षापासून शाळेतच पडून होता. मग यानी प्रत्‍येक भेटी दरम्‍यान कशी तपासणी केली. तसेच मुख्‍याध्‍यापकाने संस्‍थाचालकांनीच हा सर्व प्रकार मला यात अडकवण्‍यासाठी केल्‍याचा लेखी आरोप या अधिका-याकडे कडे केले आहे. मुख्‍याध्‍यापकाच्‍या आरोपानुसार दोन शिक्षक व एक सेवक यांचे पद नियमित करण्‍यासाठी संस्‍था चालकांनी दबाव आणून बोगस पट संख्‍या नोंदवली आहेत. त्‍यामुळे जी मुलेच शाळेत नाहीत, पण त्‍यांच्‍या नावाचा पोषण आहार आजपर्यंत शाळेत येत राहिला, तोच माल हा शिल्‍लक आहे. असा गंभीर आरोप खुद्द मुख्‍याध्‍यापकांनी केला आहे. यासाठी आलेली रोख रक्‍कमसुध्‍दा संस्‍थाचालकांच्‍या दबावापोटी दुसरीकडे खर्च केल्‍याचे नमूद करुन वरील सर्व गैरप्रकार करणा-या मुख्‍याध्‍यापक, संस्‍थाचालक व वेळोवेळी तपासणी करणारे केंद्रप्रमुख, विस्‍ताराधिकारी यांच्‍यावर फौजदारी स्‍वरुपाचा गुन्‍हा दाखल करण्‍याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत भुमकर यांनी केली आहे. निवेदनाची प्रत  मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा पोलीस अधिक्षक, जिल्‍हाधिकारी याना पाठविण्‍यात आले आहे.
 
Top