मुंबई -: सचिन तेंडुलकरची विक्रमी २००वी कसोटी वानखेडे स्टेडियमवर होईल. दस्तुरखुद सचिनने बीसीसीआयला तशी विनंती केल्याची माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशचे (एमसीए) अध्यक्ष रवी सावंत यांनी शुक्रवारी केली.. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने गुरुवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर सचिनची २००वी कसोटी कोठे होणार याबद्दल चर्चा सुरु होती. अखेर घरच्या मैदानावरच होणार असल्याने सचिनच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  त्‍यामुळे सचिन वेस्‍ट इंडि‍जविरुद्ध 200 वा कसोटी सामना मुंबईतच खेळणार आहे. हा सामना 14 ते 18 नोव्‍हेंबर या कालावधीत होणार आहे.
    सचिनने निवृत्तीचा निर्णय कळविताना बीसीसीआयला लिहीले होते, की भारतासाठी क्रिकेट खेळावे हे माझे आयुष्‍यातील सर्वात मोठे स्‍वप्‍न होते. गेल्‍या 24 वर्षांपासून मी हे स्‍वप्‍न जगत आलो आहे. क्रिकेट खेळण्‍याव्‍यतिरिक्त आयुष्‍याची कल्‍पनाच करणे अतिशय कठीण आहे. कारण वयाच्‍या 11 व्‍या वर्षापासून मी हेच करत आलो आहे. भारतासाठी खेळेणे हा माझ्यासाठी फार मोठा सन्‍मान होता. मी बीसीसीआयचे आभार मानतो. बीसीसीआयने मला भरपूर दिले. निवृत्त होण्‍यासाठी हीच वेळ असल्‍याचे मला वाटले. त्‍यानंतर निवृत्तीचा निर्णय घेण्‍यासाठी सहमती दिल्‍याबद्दलही मी बीसीसीआयचे आभार मानतो. संयम आणि समजूतदारी दाखवणा-या माझ्या कुटुंबियांचेही मी आभार मानतो. माझे तमाम चाहते आणि शुभेच्‍छुकांचेही मी आभार मानतो. आता माझे लक्ष 200 व्या कसोटीकडे लागले आहे. ही कसोटी माझ्या घरच्या मातीत व्‍हावी, अशी मनापासून इच्‍छा आहे.
 
Top