पांगरी (गणेश गोडसे) :  अठ्ठावीस वर्षांपुर्वी अल्पशा रजेवर जेलबाहेर आलेला आरोपी अद्यापपर्यंत जेलमध्ये परत आला नसल्यामुळे सुमारे अठ्ठावीस वर्षांच्या कालावधीनंतर त्याच्याविरूदध गुन्हा दाखल करण्‍याचा पराक्रम पुणे येथील येरवाडा मध्यवर्ती कारागृहाच्या प्रशासनाने दाखवला आहे.
    विजय ज्ञानदेव घावटे (रा. पांढरी, ता. बार्शी) असे फरार असलेल्या कैद्याचे नांव आहे. राहुल मारूती भोसले (वय 31 तुरूंगरक्षक येरवाडा मध्यवर्ती कारागृह पुणे) असे पांगरी पोलिसात गुन्हा दाखल केलेल्याचे नांव आहे. अठ्ठावीस वर्षांच्या काळानंतर फरार आरोपीविरूध्‍द गुन्हा दाखल करण्‍याची कार्यवाही संबंधित प्रशासनाकडुन करण्‍यात आल्यामुळे सर्वसामान्यांमधुन आश्‍चर्य व्यक्त केले जात असुन प्रशासनाचा भोंगळ कारभार या निमित्ताने जनतेसमोर आला आहे.
  पांढरी (ता.बार्शी) येथे झालेल्या खुनप्रकरणी विजय ज्ञानदेव घावटे हा आरोपी पुणे येथील येरवाडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असताना 7 नोव्हेंबर 1985 रोजी विभागीय आयुक्त विधानभवन पुणे यांच्या आदेशान्वये त्यांना पंधरा दिवसांची अभिवचन रजा देण्‍यात आली होती. त्‍यांचे वडील ज्ञानदेव कृष्णा घावटे हे अभिवचन रजेला जामिनदार म्हणुन होते. पंधरा दिवसानंतर पुन्हा 20 दिवसाची रजा वाढवुन देण्‍यात आली होती. बंदी विजय घावटे याने रजा उपभोगुन 2 डिसेंबर 1985 रोजी येरवाडा मध्यवर्ती कारागृहात स्वताः हजर रहाने गरजेचे होते. मात्र आरोपी घावटे हा कारागृहात हजर न होता अद्यापपर्यंत फरार आहे. रजेवर कारागृहाबाहेर सोडल्यानंतर जास्त काळ अनाधिकृतपणे कारागृहाबाहेर राहिल्‍याप्रकरणी पांगरी पोलिसात तुरूंगरक्षकांनी दिलेल्या फिर्यादिवरून घावटे याच्याविरूदध गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.
 
Top