पांगरी (गणेश गोडसे) :  यावर्षी पांगरी (ता. बार्शी) परिसरात म्‍हणावा तितका पाऊस झाला नसला तरी इतर ठिकाणी ब-यापैकी वरूणराजाने हजेरी लावली आहे. त्‍यामुळे घाटमाथ्यावर पडलेल्या पावसाचे पाणी पांगरी परिसरातील साठवण तलावात येत असल्यामुळे पाथरी साठवण तलाव वगळता इतर सर्वच प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरून वाहु लागले आहे. त्‍यामुळे शेतक-यांसह सर्वसामान्यांमधुन समाधान व्यक्त होत आहे. तलाव पुर्ण क्षमतेने भरून वाहत असल्यामुळे गत तीन वर्षात घटलेल्या ऊसाच्या क्षेत्रात वाढ होण्‍याची शक्यता व्यक्त होत आहे. अनेक वर्षे दुष्काळाचे चटके बसलेल्‍या शेतक-यांना यावर्षी तरी भरघोष उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा शेतक-यांतून केली जात आहे.
   यावर्षी पांगरी परिसरात जरी वरूणराजाने दमदार हजेरी लावली नसली तरी शेजारील उस्मानाबाद जिल्हयात झालेल्या दमदार पावसामुळे तेथील पाणी वाहुन पांगरी परिसरातील अनेक साठवण व लघु प्रकल्पात नैसर्गिकरित्या आल्यामुळे या भागातील शेतक-यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. जर घाटमाथ्यावर पाउस झाला नसता तर सध्या पांगरी परिसरात खुपच विचित्र परिस्थती समोर दिसली असती. पांगरी परिसरातील पाथरी साठवण तलाव वगळता झानपुर, पांढरी कारी, गोरमाळा, खडसरी आदी साठवण तलाव सध्या पुर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक वर्षांनंतर पुन्हा शेतक-यांच्या चेह-यावर हास्य खुलुन आले असल्याचे दिसत आहे.
पांगरी परिसरात ऊसाच्या क्षेत्रात वाढ होणार 
1972 पेक्षाही दुष्काळाची जास्त दाहकता भोगलेल्या पांगरी भागातील ऊस ऊत्पादक शेतक-याचे सलग तीन वर्षांतील भिषण पाणीटंचाईने अक्षरक्षः कंबरडे मोडलेले आहे. मात्र या वर्षी साठवण तलावात पुर्ण क्षमतेने पाणी साठलेले असल्यामुळे या भागातील शेतकरी पुन्हा एकदा नव्या दमाने ऊसाची लागवड करण्‍याचा विचार करू लागलेला आहे. सध्या उसबेणे कोणते वापरायचे, सुधारित वान कोणता बेने लावायचे का ऊसाचे तयार रोपेच खरेदी करायची, ऊसाची लागवड पटटा पदधतीने करायची का, जुन्या प्रचलीत पध्‍द1तीनेच करायची आदी ऊस लागवडीसंदर्भातीलच चर्चा पांगरी विभागातील उस उत्पादक शेतक-यांमधुन ऐकावयास मिळत आहेत. सध्या मात्र बार्शी तालुक्यातील कांही अंशीच उस उत्पादक शेतक-याचा ऊस शिल्लक राहीलेला आहे. नविन ऊस लागवड यावर्षी मोठया प्रमाणात करण्‍याकडे शेतक-यांचा कल दिसुन येत आहे.
        ऊस लागवडीवर साखर कारखान्यांचे भवितव्यः सध्या बार्शी तालुक्यातील साठवण तलावात समाधानकारक पाणी साठा झाल्यामुळे नव्याने उस लागवड मोठया प्रमाणावर सुरू झाली असली तरी हा उस साखर कारखान्यांना पुढील वर्षीच्या हंगामासाठी उपलब्ध होणार आहे. बार्शी तालुक्यात सध्या दोन खासगी साखर कारखाने कार्यरत असुन त्यापैकी एका खासगी साखर कारखान्याने तर यावर्षीचा गळित हंगाम करणार नसल्याचे जाहीर केले आहे. यावर्षी साखर कारखान्यांना गळीत हंगामास पुरेल एवढा ऊस शिल्लक नसल्यामुळे अनेक साखर कारखान्यांना आपला गळीताचा हंगाम लवकरच आटोपता घ्यावा लागणार आहे. गतवर्षी शेजारील उस्मानाबाद जिल्हयातील सर्वच साखर कारखाने उसाच्या व पाण्याच्या उपलब्धतेअभावी जवळपास बंद ठेवण्‍यात आले होते. त्यामुळे त्याचा लाभ शेजारील तालुक्यांना होऊन समाधानकारक ऊस येथील कारखान्यांना उपलब्ध झाला होता. त्यामुळे कारखाने पुर्ण क्षमतेने चालले होते. मात्र येत्या 1 नोव्हेंबरपासुन शासनाच्या परवानगीने सुरू होणा-या अनेक साखर कारखान्यांना यावर्षी उसाच्या उपलब्धतेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनच कारखान्याचे गळित हंगाम यशस्वी करावे लागणार आहेत.
पाण्याचा काटेकोर वापर गरजेचा
साठवण तलाव पुर्ण क्षमतेने भरले की शेतकरीही उपलब्ध पाण्याचा नियोजनबध्‍द व गरजेनुसार वापर करण्‍याकडे दुर्लक्ष करून पाण्याचा अतिरीक्त वापर करण्यावर जास्त भर दिला जातो. मात्र त्यामधुन पाण्याचा अपव्यय होऊन पाण्याची मोठया प्रमाणात नासाडी होते. शासनाने ऊस पिकासाठी ठिबक सिंचन सक्तीचे करण्‍याचा निर्णय घेतला असला तरी त्याची काटेकोर अंमलबजावनी होणे गरजेचे आहे. तसे झाले तरच पाण्याचा सदुपयोग होईल.
 
Top