
दि. 5 ऑक्टोबर रोजी सर्वत्र श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली आहे. देवीच्या दर्शनासाठी आंध्र व कर्नाटक राज्यातून उमरगा येथून नळदुर्ग मार्गे श्री क्षेत्र तुळजापूरला पायी चालत जाणा-या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. यापूर्वी नळदुर्ग-तुळजापूर रस्त्यावर भरधाव वाहनामुळे अपघात झाले, त्यात भाविकांचाही मृत्यू झाल्याचीही घटना घडल्याचे सर्वश्रूत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने पायी चालत जाणा-या भाविकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने नळदुर्ग-तुळजापूर हा मार्ग जड रहदारीसाठी शनिवार रोजी पहाटेपूर्वीपासून बंद करण्यात आला आहे. फक्त या मार्गावरुन प्रवाशी वाहने, एसटी बस धावणार आहेत. जड वाहनांची वाहतूक आष्टामोड (ता. लोहारा), पाटोदा, बेंबळी मार्गे उस्मानाबाद याप्रमाणे वाहनांची रहदारी वळविण्यात आली आहे.
यापूर्वी नळदुर्गहून श्री क्षेत्र तुळजापूरकडे जाणारा रस्ता दसरा दिवशी व कोजागिरी पौर्णिमेपूर्वी जड वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. मात्र यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच नवरात्र महोत्सवाच्या पहिल्या दिवशीपासून नळदुर्ग पोलीसांनी तुळजापूर फाट्याजवळ असलेल्या गोलाई चौकात बॅरेगेटस लावून जड वाहनांसाठी रस्ता बंद केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक पी.बी. पाटील, वाहतुक पोलीस हवालदार विजय राठोड, पोकॉ. कांत राठोड, शिवाजी बारगजे, राजेंद्र चव्हाण, बजरंग सरपाळे आदीसह पोलिस कर्मचा-यांनी अनुचित प्रकार घडू यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवले आहे.