पंढरपूर - श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिराचे सुशोभीकरण करताना पुराणकालीन स्वरूप कायम ठेवण्यात येईल. मूर्तीसह मंदिराच्या सुशोभीकरणापूर्वी वारकरी, फडकरी, कीर्तनकार, प्रवचनकार व भक्तांच्या भावना विचारात घेतल्या जातील. त्यानंतरच पुरातत्त्व विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतला जाईल, असे मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी सांगितले.
    दोन दिवसांपूर्वी एमआयटी संस्थेचे प्रमुख डॉ. विश्वनाथ कराड व प्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ विजय भटकर पंढरपुरात आले होते. या वेळी त्यांनी मंदिराचा देव्हारा, सिंहासन, गरुडखांब, प्रवेशद्वार आदी सोन्याने मढवण्यासंदर्भात मंदिर समितीकडे प्रस्ताव सादर केला. त्यानंतर मंदिर समितीने खास पत्रक काढून समिती सदस्यांची बैठक व कराड यांच्या प्रस्तावाची माहिती दिली होती. डॉ. कराड यांच्या सोन्याने मंदिर मढवण्याच्या प्रस्तावाविषयी वारकर्‍यांसह काही महाराज मंडळींनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे मंदिर समितीचे अध्यक्ष डांगे यांनी बुधवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे समितीची भूमिका स्पष्ट केली.
    श्री विठ्ठल मूर्तीची झीज झाली आहे. तसेच मंदिरास अनेक ठिकाणी भेगा आहेत. पुरातत्त्व अभ्यासक वसंत शिंदे व पुरातत्व विभागाचे रसायनतज्ज्ञ एम. सिंग यांनी मंदिराची संपूर्ण पाहणी करून प्राथमिक अहवाल समितीस सादर केला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी मंदिरातील एक दगड भक्ताच्या पायावर पडून तो जखमी झाला. मंदिर समितीने या सर्व बाबींची दखल घेऊन पुरातत्त्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रासायनिक प्रक्रिया करणार्‍यांमार्फत मंदिराची पाहणी केली जाईल. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यावर समिती निर्णय घेईल, असे डांगे यांनी पत्रकात नमूद केले आहे.
 
Top