कळंब (बालाजी जाधव) : मांजरा प्रकल्‍पातुन लातूर औद्योगिक वसाहतीस उद्योगासाठी जाणारे पाणी थांबवून पिण्‍याच्‍या पाण्‍याला प्रधान्‍य द्यावे व पाणीसाठा राखीव ठेवावा, जेणेकरुन उन्‍हाळयामध्‍ये धरण परिसरातील गावे आणि शहरांना पिण्‍याच्‍या पाण्‍याचा सामना करावा लागणार नाही, अशी मागणी उस्‍मानाबाद-कळंबचे आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी धनेगाव येथील विश्राम ग्रहावर आयोजीत केलेल्‍या पत्रकार परिषदेत केली.
    शासनाच्‍या धोरणानुसार पिण्‍याच्‍या पाण्‍याला पाहिले प्राधान्‍य नंतर शेतीला द्वितीय तर उदयोगाला तृतीय प्राधान्‍य देणे गरजेचे असताना शासन धोरणच्‍या विरोधात जाऊन मांजरा प्रकल्‍पातून लातुर उदयोगासाठी पाणी दिले जात आहे. हे जर असेच चालू राहिले तर भविष्‍यातील येणा-या फेब्रवारी-मार्च महिन्‍यात परिसरातील गावांसह कळंब, केज, धारुर, अंबेजोगाई, लातूर या शहरातील लोकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. त्‍यामुळे लातूरला उदयोगासाठी जाणरे पाणी तात्‍काळ थांबण्‍यात यावे तसेच आमच्‍या पिण्‍याचे पाणी देण्‍यासाठी विरोध नाही. मात्र उदयोगाच्‍या तृतीय प्राधान्‍य क्रम असताना त्‍यातुन प्राधान्‍य कशासाठी दिले जात आहे, शेतीसाठीचे पाणी बंद केलेले आहे मात्र उदयोगातून खुलेआम पाणी देणे योग्‍य नाही असे, आ. ओमप्रकाश राजे निंबाळकर पत्रकार परिषदेत बोलताना संगितले.
    आज रोजी मांजरा प्रकल्‍पात 13.911 द.ल.घ.मी. इतका मृत पाणीसाठा असून पाण्‍याची पातळी 632.41 मीटर इतकी आहे. मृत पाणीसाठयातील 03 एम.एम.क्‍यू. गाळ जर वजा केला तर निव्‍वळ 10.911 द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा शिल्‍लक आहे. मांजरा प्रकल्‍पावर मोठया पाच पाणीपुरवठा योजना असून इतर सात खेडयांना येथून पाणीपुरवठा होतो. लातूर औद्योगिक वसाहतीस 0.0058 दलघमी, लातूर मनपा 0.035 दलघमी, कळंब न.प. 0.0054 दलघमी, अंबेजोगाई 0.01064 दलघमी, केजधारुर 0.0043 दलघमी इतका दररोज पाणीपुरवठा केला जात असून शिराढोण, आवाडशिरपूरा, धनेगांव, मुरुड, माळेगांव या गावांना 0.00191 दलघमी इतका दररोज पाणीपुरवठा केला जात आहे. तर 0.0194 दलघमी पाण्‍याचे दररोज बाष्‍पीभवन होत असल्‍याची माहिती या प‍त्रकार परिषदेत जलसंपदा विभागाचे मांजरा प्रकल्‍प शाखाधिकारी बी.एम. वैरागे यांनी यावेळी दिली.
    आता या प्रकल्‍पात 105 दिवस पुरेल इतकेच पाणी असून ते दि. 5 फेब्रुवारी 2014 पर्यंतच पुरणार आहे. आ. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी यावेळी पाण्‍याचे चक्‍क ऑडीटच करुन त्‍याचा लेखाजोखा काढला. उद्योग साठीचे जाणारे पाणी बंद केल्‍यास जास्‍त दिवस पाणी पुरेल व पाणीटंचाई निर्माण होणार नाही, त्‍यामुळे धरणातील पाण्‍याचा सद्यस्थितीचा अहवाल जलसंपदा विभागाने तात्‍काळ बीड, लातूर व उस्‍मानाबादच्‍या जिल्‍हाधिका-यांना लेखी कळवावा, अशी सुचना आ. निंबाळकर यांनी केल्‍या.
    या पत्रकार परिषदेपूर्वी प्रकल्‍पाची पाहणी निंबाळकर यांनी केली. पत्रकार परिषदेस कळंबचे नगराध्‍यक्ष शिवाजी कापसे, उपनगराध्‍यक्ष पांडुरंग कुंभार, नगरसेवक मुश्‍ताक कुरेशी, शिवसेना कळंब तालुकाप्रमुख रामलिंग आवाड, संदीप बावीकर, तहसिलदार डी.एम. शिंदे, न.प. मुख्‍याधिकारी सुंदर बोंदर, बालाजी जाधवर, न.प. कर्मचारी बावळे, कवडे, जलसंपदा विभागाचे अधिकारी बी.एम. वैरागे यांच्‍यासह कर्मचारी उपस्थित होते.
 
Top