नळदुर्ग -: शेतक-यांच्‍या आयुष्‍यामध्‍ये क्रांतिकारी बदल होण्‍यासाठी शासनाची महत्‍वाकांक्षी योजना सध्‍या सुरु असून उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात जवळपास साडे तिनशे गावात एकात्मिक पाणलोट व्‍यवस्‍थापन कार्यक्रम सुरु आहे. यामध्‍ये ज्‍या गावचे शेतकरी जागरुकपणे या योजनेकडे पाहतील व अभ्‍यास करुन आपल्‍या गावाच्‍या विकासासाठी एकत्रिपतणे नियोजन करतील त्‍याच गावाचा यापुढे विकास होणार आहे. त्‍यामुळे शेतक-यांनी पाणलोटाची योजना समजून घेऊन आपल्‍या गावात यशस्‍वी करण्‍याचे आवाहन परिवर्तन सामाजिक संस्‍थेचे सचिव मारुती बनसोडे यांनी गौर (ता. कळंब) येथे महात्‍मा गांधी जयंतीनिमित्‍त आयोजित केलेल्‍या जाणीव जागृती कार्यक्रमांतर्गत कलापथकाच्‍या कार्यक्रमात केले.
    कळंब तालुक्‍यातील क्‍लस्‍टर नं. 13 मध्‍ये गौर, दहीफळ, शेलगाव (दि.), सातेफळ, भोसा, बरमाचीवाडी व वाणेवाडी या सात गावातून परिवर्तन सामाजिक संस्‍था ही प्रकल्‍प प्रशिक्षण संस्‍था म्‍हणून कार्यरत आहे. त्‍याचाच एक भाग म्‍हणून गौर या गावातून कार्यक्रमाची सुरुवात करण्‍यात आली. या भागात सर्व गावामध्‍ये मिळून एकूण 60 कार्यक्रम घेण्‍यात येणार आहेत. हा कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी बंटी देडे व त्‍यांचे कलापथक, परिवर्तन सामाजिक संस्‍थेचे पदाधिकारी अण्‍णा सातपुते, पाणलोटचे सचिव चंद्रकांत माळी आदींनी परिश्रम घेतले.
 
Top