पांगरी -: शासकीय, निमशासकीय कार्यालयांसंदर्भात असलेल्या अडी अडचणींची सोडवणुक करून त्याचा जागेवरच निपटारा करण्‍याच्या उदात्त हेतुने महाराष्ट्र शासनाच्या सुवर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत पांगरी (ता. बार्शी) येथे राबवण्‍यात आलेल्या समाधान दिनात अनेक प्रश्‍न निकाली काढण्‍यात आले.
    समाधान दिनाचे उदघाटन बार्शीचे तहसिलदार बालाजी सोमवंशी यांच्या हस्ते करण्‍यात आले. बार्शी पंचायत समितीच्या सभापती सौ. कौशल्या माळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी पांगरीचे मंडळाधिकारी एस.व्ही.बदे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नियंत्रक यावलकर, विद्युत वितरण कंपनी पांगरीचे शाखा अभियंता प्रविण गाडेकर, महाराष्ट्र जिवन प्राधिकरणचे बागवान, पांगरीचे गाव कामगार तलाठी राठोड, शशिकांत नारकर, ग्रामपंचायत सदस्य अकिल बागवान, शिवाजी कोळी, चंद्रकांत गोडसे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ व विविध खात्याचे पदाधिकारी उपस्थित होते.
   पांगरी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील प्रांगणात पार पडलेल्या या समाधान दिनात लोकांनी प्रशासनाच्या विविध विभागाविषयी मांडलेल्या समस्या, त्यांचे प्रश्‍न हे तात्काळ जागेवरच मिटवण्‍यात आले. तसेच समाधान दिनाचे औचित्य साधुन शिधा पत्रिका 7/12, 8 अ चे उतारे, विविध प्रकारचे ऊत्पन्नाचे दाखले यासह आम आदमी विमा योजनेचे प्रमाणपत्र वाटप करण्‍यात आले. तसेच उपस्थितांना जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा योजना, संजय गांधी निराधार योजना, घरकुल योजना, श्रावणबाळ यासह शासनाच्या इतर लोकोपयोगी योजनांची माहिती देण्‍यात आली. रणजित पानगांवकर यांनी प्रास्ताविक केले.
 
Top