नळदुर्ग :- सध्‍या देशालाच भ्रष्‍टाचाराचे भिरुड लागले असून ते नष्‍ट करण्‍यासाठी समाजातील सर्वांनी प्रयत्‍न करणे गरजेचे आहे. समाज प्रबोधनाचे महत्‍वपूर्ण कार्य कलावंतांच्‍या माध्‍यमातून होत आहे. जिथे कलावंत तिथे चांगलेच कार्य होते, नेता हा समाजाला कधी कधी सुख देतो तर कधी कधी दुःख ही देतो परंतु अभिनेता हा मात्र समाजाला फक्‍त सुख आणि सुखच देतो, असे प्रतिपादन मराठी चित्रपटातील सुप्रसिध्‍द अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी हगलूर (ता. तुळजापूर) येथे केले.
    अण्‍णा दराडे लिखित मराठी 'भिरुड' या कादंबरीचे प्रकाशन सोहळा मंगळवार दि. 5 नोव्‍हेंबर रोजी तुळजापूर तालुक्‍यातील हगलूर येथे रात्री आठ वाजता पालकमंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते व अभिनेता मकरंद अनासपुरे, ज्‍येष्‍ठ अभिनेते कुलदीप पवार, तुळजाभवानी साखर कारखान्‍याचे व्‍हा. चेअरमन सुनील चव्‍हाण, पुण्‍याचे उद्योगपती बाळासाहेब हरपळे,  दिग्‍दर्शक व अभिनेते रमाकांत सुतार, डॉ. पवन सोनवणे,सरपंच अंकुश पाटील, अण्‍णा दराडे, पिंपरीचिंचवडचे तहसिलदार किरणकुमार काकडे, शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर चव्‍हाण, तुळजापूर पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश चव्‍हाण स्वामी सर्मथ अर्बन बँकेचे चेअरमन धिमाजी घुगे  आदींच्‍या प्रमुख उपस्थितीत संपन्‍न झाला.
    यावेळी बोलताना मकरंद अनासपुरे पुढे म्‍हणाले की, आपल्‍या संस्‍कृतीचा अनमोल ठेवा भावी पिढीसमोर जसाच्‍या तसा ठेवण्‍यासाठी मराठी भाषेवर प्रेम करुन ख-या अर्थाने समाजाचे वास्‍तव प्रतिबिंब साहित्‍यातून दिसले पाहिजे. युवकांच्या हाती परिवर्तन घडविण्याची ताकद असुन प्रत्येकाने जीवनात काही तरी वेगळे करून नाव कमविण्याचा प्रयत्न करावा. महाराष्ट्राला महान मंडळींचा वारसा लाभला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत कार्य करावे. केवळ टवाळकी करण्यात आयुष्य न घालविता देशसेवेचे काम करावे. त्यामुळे आगामी काळात देशाची प्रगती होईल असेही त्‍यानी सांगितले . यावेळी अनेकांनी आपले विचार व्‍यक्‍त केले . कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक अण्‍णा दराडे तर सुत्रसंचालन विनायक अहंकारी यांनी केले. नितीन पाटील यांनी आभार मानले.
 
Top