नळदुर्ग -: अनुसुचित जातीसाठी असलेल्‍या तेरा टक्‍के आरक्षणातून मातंग समाजाला लोकसंख्‍येच्‍या प्रमाणात स्‍वतंत्र आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसह अन्‍य इतर महत्‍त्‍वाच्‍या मागणीसाठी लहुजी शक्‍ती सेनेच्‍यावतीने संस्‍थापक अध्‍यक्ष विष्‍णूभाऊ कसबे यांच्‍या नेतृत्‍वाखाली शुक्रवार दि. 22 नोव्‍हेंबर रोजी मुंबई मंत्रालयावर विराट मोर्चाचे आयोजन करण्‍यात आल्‍याची माहिती लहुजी शक्‍ती सेनचे उस्‍मानाबाद जिल्‍हाध्‍यक्ष सोमनाथ कांबळे यांना इटकळ (ता. तुळजापूर) येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
    मातंग समाजाच्‍या सर्वांगिण विकासाचा आढावा घेतला असता, लहुजी वस्‍ताद साळवे मातंग आभ्‍याग आयोगाने शासनाला केलेल्‍या शिफारसी त्‍वरीत लागू करुन मातंग समाजाला लोकसंख्‍येच्‍या प्रमाणात आरक्षण देण्‍यास महाराष्‍ट्र सरकार केंद्र सरकारकडे अहवाल पाठविण्‍यास टाळाटाळ करीत आहे. त्‍यामुळे सरकारला जागे करण्‍यासाठी लहुजी शक्‍ती सेनेच्‍यावतीने मुंबई येथील आझाद मैदानावर मंत्रालयासमोर या आयोजन करण्‍यात आल्‍याचे सोमनाथ कांबळे यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्‍हणाले, या प्रमुख मागणीबरोबरच लहुजी वस्‍ताद साळवे याना भारतरत्‍न पुरस्‍कार द्यावा, लहुजी साळवे यांच्‍या जयंती दिनी शासकीय सुट्टी जाहीर करावी, प्रत्‍येक शासकीय कार्यालयात लहुजी साळवे यांचे चित्र शासकीय खर्चातून लावावे, आदी मागण्‍यासाठी हा मोर्चा काढण्‍यात येणार आहे. या मोर्चास उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातून जवळपास पंचवीस हजार कार्यकर्ते मुंबईला जाणार असल्‍याचे कांबळे यांनी सांगितले.
(एस.के. गायकवाड)
 
Top