उस्मानाबाद : केंद्र शासनाच्या मतीमंद बहुविकलांग राष्ट्रीय विश्रवस्त कायदा 1999 च्या कलम 23 नुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्थानिकस्तर समिती गठीत करण्यात आली आहे. ऑटिसम, मेंदूला पक्षाघात, मानसिक अपंगत्व आणि मल्टिपल डिसेबिलीटी असलेल्या मुलांचे त्यांच्या आई- वडीलांना कायदेशीर पालकत्व मिळू शकते. आई वडील जिवंत नसतील तर बहिण, आजी-आजोबा, मामा- मामी किंवा काका-काकी व इतर नातेवाईक स्वत: पालकत्व घेवू शकतात. वयाची अठरा वर्ष पुर्ण झाल्यानंतरही त्या व्यक्तीचे कायदेशीर प्रतिनिधीत्व संबंधित करु शकतात. कायदेशीर पालकत्व मिळाल्यानंतर मतिमंद व्यक्तीसाठी असणा-या विविध योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे. तसेच मंतिमद बहुविकलांग व्यक्तीच्या मालमत्तेचे संरक्षण करावयाचे आहे अशा इच्छुक व्यक्तीनी किंवा मतिमंद बहुविकलांग व्यक्तीच्या पालकांनी कायदेशीर पालकत्व मिळवून घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्जासोबत मतिमंद बहुविकलांग व्यक्तीचे जिल्हा शल्यचिकित्सक, उस्मानाबाद यांचेकडील 40 टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र, दोन व्यक्तींची साक्षीदार म्हणून स्वाक्षरी, कायेदेशीर पालकत्व घेणाऱ्या व्यक्तीची सहमती, आई- वडील असतील तर साध्या कागदावर मात्र इतर पालक असतील तर 100 रुपयांच्या स्टॅंम्प पेपरवर सहमती, मतिमंद व्यक्ती व पालकत्व स्वीकारणाऱ्याचा एकत्रीत पासपोर्ट साईज फोटो, मतिमंद व्यक्तीचे नाव असलेल्या रेशन कार्डची झेरॅाक्स प्रत, व वयाचा/शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी कागदपत्रे घेवून समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद येथे संपर्क साधावा असे आवाहन, जिल्हा समाज कल्याण अधिकारी खुशाल गायकवाड यांनी पत्रकाद्वारे केले आहे.