डॉ. निशिगंधा माळी
बार्शी -: नागरिकांच्‍या आरोग्‍यासाठीच हाणगदारीमुक्‍त गाव ही संकल्‍पना मांडण्‍यात आली असून यासाठी शौचालय बांधण्‍यासाठी शासकीय अनुदानही देण्‍यात येत आहे. नव्‍या पिढीच्‍या उत्‍तम आरोग्‍यासाठी निर्मलग्राम अभियानाला साथ द्या, असे आवाहन सोलापूर जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांनी केले.
    बार्शी तालुक्‍यातील चारे येथे डॉ. माळी यांनी महिला व ग्रामस्‍थांच्‍या उपस्थितीत सभा घेत त्‍यांच्‍याशी भेट संवाद साधला. यावेळी जिल्‍हा परिषद विरोधी पक्षनेते संजय पाटील, पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, हणुमंत धस, गणेश शिंदे, सचिन जाधव तसेच गावच्‍या सरपंच उपस्थित होत्‍या.   
    निर्मलग्राम अभियानात सोलापूर जिल्‍हा खुप गांभीर्याने काम करीत आहे. आतापर्यंत 274 पेक्षा अधिक गावे निर्मलग्राम झाली असून यापुढच्‍या काळात संपूर्ण जिल्‍ह्याच या निर्मलग्राम गाव करण्‍याचा मानस आहे. या दिशेने सर्वोत्‍तोपरी प्रयत्‍न सुरु असून याला यश येत आहे. शासनाकडून राबविण्‍यात येत असलेल्‍या या योजनेत उघडयावर शौचास न बसता शौचालय बांधण्‍यासाठी नऊ हजारांवर अनुदान देण्‍यात येत आहे. पुर्वीपेक्षा हे अनुदान वाढले असून यापुढे यात कोणतेही वाढ होण्‍याची शक्‍यता नाही. ग्रामस्‍थांच्‍या उत्‍तम आरोग्‍यासाठीच शासनाची ही धडपड सुरु आहे. जिल्‍हा परिषदेकडूनही जोराचे प्रयत्‍न केले जात आहेत. ज्‍या व्‍यक्‍तीकडे शौचालय नाही, त्‍यांना प्रशासकीय कामासाठी आवश्‍यक असणारी कोणतीही कागदपत्रे दिली जाणार नाहीत. ग्रामस्‍थांनी या अभियानात सक्रीय होऊन साथ दिल्‍यास निश्चितपणे संपूर्ण जिल्‍हा हागणदारीमुक्‍त होण्‍यासाठी मदत होईल, असेही डॉ. माळी म्‍हणाल्‍या.
    जिल्‍हा परिषद विरोधी पक्षनेते संजय पाटील यांनीही या योजनेत प्रस्‍तावित असलेल्‍या गावांसाठी निर्मलग्राम पुरस्‍कार मिळविण्‍याची ही नामी संधी असल्‍याचे सांगत घरोघरी शौचालय बांधावे, असे आवाहन केले. गणेश शिंदे, सचिन जाधव यांनी वेगवेगळी उदाहरणे देत स्‍वच्‍छतेचे व निरोगी आरोग्‍याचे महत्‍त्‍व पटवून दिले. जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांनी सोमवारी गावातच मुक्‍काम करुन महिला व ग्रामस्‍थांचे प्रबोधन केले. दुस-या दिवशी हिमोग्‍लोबीनची तपासणी करण्‍यात आली. तसेच घरभेटीतूनही डॉ. माळी यांनी ग्रामस्‍थांमध्‍ये या योजनेविषयी जागृती केली.
(मल्लिकार्जून धारुरकर)
 
Top