नवी दिल्‍ली - देशातील चार राज्‍यांमध्‍ये झालेल्‍या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. दिल्‍लीत आम आदमी पक्षासोबत भाजपची कडवी टक्‍कर आहे. दिल्‍लीतही सत्तेचा मार्ग मोकळा होण्‍याचे चित्र आहे. परंतु, भाजपने सावध पावित्रा घेतला आहे. पक्षाच्‍या संसदीय समितीच्‍या बैठकीनंतर पक्षाचे अध्‍यक्ष राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्‍पष्‍ट केली. दिल्‍लीतील संपूर्ण निकाल आल्‍यानंतरच आम्‍ही पुढचा निर्णय घेऊ. चारही राज्‍यात भाजपचीच सत्ता येणार, असे राजनाथ सिंह म्‍हणाले. दिल्‍लीत भाजपला 33 जागा मिळण्‍याची शक्‍यता आहे. तसेच दोन अपक्ष विजयी झाले आहेत. अपक्षांनी पाठींबा दिल्‍यास भाजपला 'आप'च्‍या पाठींब्‍याची गरज राहणार नाही.
    'आप'ने भाजपला पाठींबा देण्‍याची तयारी दर्शविली आहे. कॉंग्रेसने 'आप'ला सरकार स्‍थापनेसाठी पाठींबा देण्‍याची ऑफर दिली होती. परंतु, 'आप'च्‍या नेत्‍यांनी ही ऑफर फेटाळली आहे. दुसरीकडे भाजप सरकार स्‍थापन करण्‍यास तयार असल्‍यास आम्‍ही समर्थन देऊ, असे 'आप'चे नेते मनीष सिसोदिया यांनी सांगितले आहे. 'आप'चे नेते अरविंद केजरीवाल यांनी कोणालाही पाठींबा देणार नसल्‍याचे आधीच स्‍पष्‍ट केले होते. परंतु, आता पक्षाने बदलली आहे.
    या सर्व पर्यायांबाबत संसदीय मंडळाच्‍या बैठकीत चर्चा झाली. त्‍यानंतर राजनाथ सिंह म्‍हणाले, दिल्‍लीतील निकाल आधी येऊ द्या. त्‍यानंतर पुढचा विचार करण्‍यात येईल. सध्‍या बसपकडून कोणतीही ऑफर आलेली नाही आणि आम्‍ही त्‍यांना संपर्क केलेला नाही. आम्‍ही मुख्‍यमंत्रीपदासाठी सर्व ठिकाणी स्‍वच्‍छ प्रतिमा असलेले उमेदवार दिले आहे. सर्वच ठिकाणी लवकरच विधीमंडळ समितीच्‍या अध्‍यक्षपदाची नियुक्ती करण्‍यात येईल, असे राजनाथ म्‍हणाले. या बैठकीत नरेंद्र मोदीही उपस्थित होते.
 
Top