नागपूर -: भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही प्रणाली आहे. भारताची राज्यघटना ही सर्वश्रेष्ठ असून केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही संसदीय कार्यपद्धती अस्तित्वात आहे. त्यानुसार राज्याची आर्थिक क्षमता लक्षात घेऊन राज्याच्या मंत्रिमंडळाला लोकहिताचे आणि धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात, त्यामुळे मंत्रिमंडळ हा शासन व्यवस्थेचा कणा असतो, असे प्रतिपादन संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवार रोजी केले.
    राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आयोजित राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या 43 व्या‍अभ्यासवर्गात ‘मंत्रिमंडळाची कार्यपद्धती’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी आमदार विरेंद्र जगताप, विधिमंडळाचे अन्य सदस्य, विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे यांच्यासह राज्यातील 11 विद्यापीठांमधील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयांमधील पदव्युत्तर शिक्षण घेणारे 84 विद्यार्थी उपस्थित होते.
    मंत्रिमंडळाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती देताना श्री.पाटील म्हणाले, राज्याचे मंत्रिमंडळ आणि विधिमंडळ हे धोरण ठरविणारे सर्वोच्च व्यासपीठ आहे. लोकशाही प्रणाली ही बहुमताच्या आधारावर चालते. बहुमत असलेल्या गटास राज्यपाल सरकार स्थापनेसाठी पाचारण करून त्यांच्या नेत्यास मुख्यमंत्री नेमतात आणि त्यांच्या सल्ल्याने मंत्री परिषदेची स्थापना केली जाते. मुख्यमंत्री आणि मंत्री यांचा मंत्रिमंडळात तर मंत्रिमंडळ आणि राज्यमंत्री यांचा मंत्री परिषदेत समावेश असतो. राज्यमंत्र्यांना विषयांच्या अनुषंगाने मंत्रिमंडळाच्या बैठकीस उपस्थित राहता येते. तथापि सध्याच्या सरकारने सर्व राज्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीस उपस्थित राहतील असा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असून मुख्य सचिव हे सदस्य सचिव असतात.
    मंत्रिमंडळासमोर येणाऱ्या प्रस्तावाबाबत माहिती देताना श्री.पाटील म्हणाले, एखाद्या विषयावर निर्णय घ्यावयाचा असेल तर त्याविषयीचा प्रस्ताव मंत्रालयीन विभाग स्तरावर तयार केला जातो. कक्ष अधिकारी, अवर सचिव, उपसचिव, सचिव, आवश्यकता असल्यास वित्त विभाग, विधी व न्याय विभाग अथवा सामान्य प्रशासन विभाग यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या अभिप्रायासह तो प्रस्ताव मुख्य सचिवांमार्फत मंत्री आणि मुख्यमंत्री यांना सादर केला जातो. त्यानंतर मुख्य सचिव मंत्रिमंडळ बैठकीची विषयसूची तयार करून सर्व संबंधितांना पाठवितात आणि त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत विषयवार सविस्तर चर्चा केली जाते. बैठकीत घेतलेल्या निर्णयाचे इतिवृत्तांत तयार करून ते पुढील बैठकीत अंतिम केल्यानंतर झालेल्या निर्णयांवर संबंधित विभागामार्फत अंमलबजावणी केली जाते.
    मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले जाणारे निर्णय हे पारदर्शक आणि राज्याच्या हिताचे असल्याने दूरगामी परिणाम करणारे असतात. त्यामुळे सामाजिक न्यायाचे धोरण आणि राज्याची आर्थिक क्षमता यांची योग्य सांगड घालून जबाबदारीने निर्णय घेणे महत्त्वाचे असल्याचेही संसदीय कार्यमंत्र्यांनी सांगितले.
    प्रारंभी विधानसभा सदस्य प्रा.विरेंद्र जगताप यांनी श्री.पाटील यांचा परिचय करून दिला. तर, कु.संचिता गजपुरे या विद्यार्थिनीने आभार प्रदर्शन केले.    
 
Top