ताज्या घडामोडी

नागपूर -: किरकोळ औषध व्यवसाय करतांना औषधी दुकानात नोंदणीकृत फार्मासिस्ट असणे हे रुग्णहितासाठी आवश्यक असून तशी संबंधित नियमाध्ये तरतूद आहे. फार्मासिस्ट हा रुग्ण व डॉक्टर यांच्यातील महत्वाचा दुवा असून फार्मासिस्टकडे असलेल्या ज्ञानाचा फायदा रुग्णांना होण्यासाठी औषधाची योग्य मात्रा, योग्य काँबिनेशन व औषध घेण्याची योग्य वेळ याबाबतची माहिती मिळण्यासाठी अनिवार्य असल्याची तरतूद नियमात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये केवळ रुग्ण हितास्तव कायद्याची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन करत असते, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
    विधानपरिषद सदस्य संजय दत्त यांनी याबाबतची लक्षवेधी मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते विनोद तावडे, सदस्य सर्वश्री माणिकराव ठाकरे, पांडुरंग फुंडकर, डॉ.दिपक सावंत, भाई जगताप, अमरनाथ राजूरकर यांनी भाग घेतला.
    जे औषध विक्रेते परवाना अटींचे अनुपालन करीत नाहीत अशांवर परवाने निलंबित करणे किंवा रद्द करणे यासारखी कारवाई करण्यात येते. या कारवायांच्या अंमलबजावणीमध्ये सुसूत्रता आणली जाईल, असे श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.
    या संदर्भात सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून यामध्ये औषध विक्रेत्यांच्या असासिएशनचे पदाधिका-यांचाही समावेश आहे. औषध विक्रेत्यांच्या असोसिएशनबरोबर वेळोवेळी बैठकाही घेण्यात आल्या आहेत. औषध विक्रेत्यांचे ज्या काही समस्या असतील त्यावर शासन चर्चा करण्यास तयार आहे. मात्र औषध विक्रेत्यांनी जनतेस वेठीस धरु नये, असेही पाटील यावेळी म्हणाले.
 
Top