बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : अलीपूर (ता. बार्शी) शिवारातील शेतकर्‍यांचा सहा एकर ऊस वीजेच्या खांबावरुन ठिगण्या पडल्याने जळून गेला असून सुमारे १० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
     वत्सला उध्दव पवार, उमेश पवार, ऐश्वर्या पवार अशी नुकसान झालेल्या शेतकर्‍यांची नावे आहेत. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास सदरची घटना घडली. शेतकर्‍यांनी तातडीने बार्शी नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला फोन करुन सदरचा प्रकार कळविला. अग्निशमन विभागाच्या जवानांनी तातडीने यंत्रणा कार्यान्वित करुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत सर्व क्षेत्रातील उस जळून खाक झाला होता. सदरच्या घटनेनंतर महावितरणच्या कर्मचार्‍यांना व साखर कारखान्यांच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून शिल्लक उसास तातडीने हलविण्याची विनंती करण्यात आली. साखर कारखान्याच्या अधिकार्‍यांनी तातडीने बैलगाड्यांची व एक ऊस तोड कामगारांची एक टोळी घटनास्थळी पाठवली. सदरच्या शेतामध्ये मागच्या वर्षीच साडेचार लाख रुपये खर्चून ड्रिपचे काम करण्यात आले होते, असेही शेतकर्‍यांनी सांगितले. सदरच्या ठिकाणचा पंचनामा करण्यासाठी तलाठी ए.डी.पाटील त्यांचे सहकारी सिध्दू मसलेकर तसेच विद्युत विभागाचे तंत्रज्ञ राजू घावटे हे उपस्थित राहून घटनेची माहिती घेतली. सदरचा ऊस तोड करण्यासाठी योग्य झाल्याने साखर कारखान्याकडून उसतोड करण्याची सर्व यंत्रणा पाठविण्यात येत असल्याचा संदेशही देण्यात आला होता. परंतु इकडे ठिगणी पडून संपूर्ण उसाची होळी झाल्याने शेतकरी खिन्न झाला होता.
 
Top