उस्मानाबाद :- कळंब तालुक्यातील खामसवाडी गावाला जाण्यासाठी उस्मानाबाद-खामसवाडी बस सोडावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने विभाग नियंत्रक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
    खामसवाडी हे गाव जवळपास 15 हजार लोकसंख्‍येचे गाव असून याठिकाणी प्राथमिक, माध्‍यमिक, कन्‍या शाळा, दोन बँका आहेत. गावात शालेय तसेच महाविद्यालय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्‍यांचीही संख्‍या लक्षणीय आहे. या गावाची आर्थिक उलाढाल मोठी असल्‍याने याठिकाणी जवळ असणा-या लहान-मोठ्या वाड्या-वस्‍त्‍यावरील नागरिकांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्‍यासाठी खामसवाडीलाच यावे लागते, परंतु वाहनांची अपुरी संख्‍या असल्‍याने प्रवाशाने दोन-दोन तास ताटकळत बसावे लागते.
    कळंब तालुक्‍यातील खामसवाडी हे गाव आडमार्गी असल्‍यामुळे बार्शी, लातूर याठिकाणी दैनंदिन जाणारे प्रवाशी, व्‍यापारी, नोकरदार यांना जर संध्‍याकाळी उशीर झाला तर त्‍यांना भाड्याने खासगी वाहनाचा आधार घेऊनच गावाकडे जावे लागते. या गावातील लहान-मोठे उद्योगधंदे करणा-यांची संख्‍या जास्‍त आहे. त्‍यांचा दैनंदिन संपर्क हा बार्शी, उस्‍मानाबाद यांच्‍याशी असल्‍याने बाजारासाठी स्‍थानिक प्रवाशांना प्रवास करताना अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात घेता उस्‍मानाबाद या आगाराने या मार्गावर त्‍यांच्‍या नियोजनानुसार सकाळी तसेच संध्‍याकाळी दोन्‍ही वेळा बसेस सोडण्‍याची गरज आहे.
    उस्‍मानाबादहून खेड-तडवळा-खामसवाडीला जाण्‍यासाठी प्रवाशांना ताटकळत बसावे लागत आहे. तसेच खासगी वाहनाने अधिकचे पैसे देऊन प्रवास करावा लागत असल्‍याने प्रवाशांची, विद्यार्थ्‍यांची तसेच उस्‍मानाबाद, लातूर याठिकाणी दररोज कामांसाठी जाणा-या कर्मचा-यांची गरज लक्षात घेता, या  मार्गावरील सर्व प्रवाशांना ही बस सोयीची तसेच महामंडळालाही फायद्याची ठरणार आहे. या ठिकाणी बस सुरु करावी, अशी मागणी ग्रामस्‍थांच्‍यावतीने विभाग नियंत्रक यांच्‍याकडे एका निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे. या निवेदनावर 150 ग्रामस्‍थांच्‍या स्‍वाक्ष-या आहेत.
 
Top