उमरगा (लक्ष्मण पवार) -: शिक्षणमहर्षी तात्याराव मोरे अांतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयातील शरद देशमुख व शरद सोळुंके या स्पर्धकांनी सांघिक प्रथम पारितोषिक व तात्याराव मोरे यांनी ढाल पटकावली.
उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आज मंगळवार दि. 31 डिसेंबर रोजी भारत शिक्षण संस्थेचे संस्थापक चिटणीस तात्याराव मोरे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे उदघाटन संस्थेचे संचालक अश्लेष मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी श्रीमती सुशिला देशममुख, लातूर महाविद्यालयातील प्रा. दादासाहेब लोंढे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. एन.डी. शिंदे, उपप्राचार्य डॉ. डी.एस. बिराजदार हे उपस्थित होते.
''शैक्षणिक अधोगतीस शासकीय धोरणे जबाबदार आहेत'' या विषयावर ही वाद-विवाद स्पर्धा घेण्यात आली. यावर्षी स्पर्धेचे 31 वे वर्ष आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक दोन हजार पाचशे एक रुपये, ढाल व प्रमाणपत्र लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयातील शरद देशमुख, सोळुंके शरद या स्पर्धकांनी पटकाविले. द्वितीय सांघिक पारितोषिक दोन हजार एक रुपये व प्रमाणपत्र अंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयातील यादव नारायण व गावडे बाजीराव या स्पर्धकांनी पटकाविले. तर उत्तेजनार्थ वैयक्तीक प्रथम पारितोषिक एक हजार एक रुपये व प्रमाणपत्र उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील मुगळे प्रितम या स्पर्धकाने मिळविले. उत्तेजनार्थ वैयक्तीक द्वितीय पारितोषिक पाचशे एक रुपये व प्रमाणपत्र उमरगा येथील आदर्श महाविद्यालयातील राठोड तानाजी याने पटकावले.
या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना भारत शिक्षण संस्थेचे संचालक अश्लेष मोरे यांच्या हस्ते पारितोषिक व ढाल देण्यात आली. यावेळी प्रा. दादासाहेब लोंढे, प्राचार्य डॉ. एन.डी. शिंदे, डॉ.डी.एस. बिराजदार, प्रा. पी.डी. थेटे, प्रा. व्ही.एम. पाटील, प्रा.डॉ. संजय अस्बले, प्रा.डॉ. व्ही.डी. देवरकर आदीजण उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून उस्मानाबाद येथील तेरणा महाविद्यालयातील प्रा. श्रीमती अरुणा सावरगावकर-पाटील, श्रीकृष्ण महाविद्यालयातील प्रा. आर.एन. निगडे, सेवानिवृत्त प्रा. पी.डी. थेटे, प्रा. रमेश जाधव यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षणमहर्षी तात्याराव मोरे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. व्ही.एम. पाटील, प्रा. व्ही.टी. जगताप, प्रा. एम.डी. साळुंखे, प्रा. एस.टी. तोडकर, प्रा. ए.एम. गाडेकर यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.एन.डी. शिंदे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.व्ही.एम. पाटील यांनी केले. तर डॉ.एस.एन. मुच्छटे यांनी आभार मानले.