बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी तालुक्यातील आगलावे बावी येथील खंडोबा देवस्थान हे पुरातण काळापासून प्रसिध्द आहे. येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिराचा नव्यानेच जीर्णोध्दार केला आहे. जिर्णोध्दार झाल्यापासून पहिल्यांदाच भरलेल्या खंडोबाच्या यात्रेत ग्रामस्थांचा उत्साह दिसून आला.
    परंपरेनुसार गावातील प्रत्येक घरातून लहान थोरांनी रविवारी दि. ८ डिसेंबरी रोजी हातामध्ये खंडोबाच्या दिवट्या घेऊन मंदिरात प्रदक्षीणा घातली. नैवेद्य इ. विधी पार पडल्यानंतर भजन, किर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. लोकांच्या मनोरंजनासाठी सोंगे इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन मंदिर समितीकडून करण्यात आले होते.
    सुमारे तीन ते साडेतीन हजार लोकसंख्‍या असलेल्‍या बावी येथील लोक शेती हा व्‍यवसाय मुख्‍यत्‍वे करताना दिसून येतात. काळी कसदार जमीन तसेच गावापासून काही अंतरावर झालेल्‍या ढाळे पिंपळगाव मध्‍यम प्रकल्‍पामुळे येथील जमिनी बागायती झाल्‍या आहे. ग्रामस्‍थांच्‍या वागणुकीने शासनाकडून तंटामुक्‍त पुरस्‍कारानेही गावाचा सन्‍मान करण्‍यात आला आहे. प्राथमिक, माध्‍यमिक, उच्‍च माध्‍यमिक विद्यालयांची सुविधा असल्‍याने साक्षरतेचेही प्रमाण चांगले आहे. लोकशिक्षण, अंधश्रध्‍दा निर्मूलन, महिला सबलीकरण आदी कामांमुळे गावातील वातावरण विकासाला पुरक झाले आहे.
    विविध विकास निधीतून मंदिराच्‍या जिर्णोध्‍दाराचे काम न करता लोकवर्गणीतून नव्‍याने जिर्णोध्‍दार झालेल्‍या मंदिरात भव्‍य गाभारा, प्रशस्‍त बांधकाम, शिखर, बाहेरील आवारात सुंदर फरशी, मंदिराभोवती चांगल्‍या कंपौंडने मंदिराचे वातावरण मंगलमय व सुशोभित करण्‍यात आले आहे. मंदिरात शिवलिंगाचीदेखील प्राणप्रतिष्‍ठा करण्‍यात आली आहे. वर्षभर अध्‍यात्मिक वातावरण, भजन, किर्तन आदींच्‍या मार्मत, संस्‍काराक्षम पिढी निर्माण करण्‍याचे कामही ग्रमस्‍थांतून होत आहे. सन 2000 मध्‍ये महाराष्‍ट्रीय वारकरी संत संमेलन मेळावा तसेच जगदगुरु शंकराचार्यांनी दिलेली आवर्जून भेट यामुळे संतांची भूमी म्‍हणूनही या गावची ओळख आहे. यात्रेमध्‍ये सोंग, विविध कलागुणदर्शन, कुस्‍त्‍या आदी कार्यक्रम आयोजित केले जातात. सर्व ग्रामस्‍थांनी एकत्रित येऊन यात्रा शांततेत पार पडेल, याकडे लक्ष दिले आहे.
 
Top