सोलापूर :-  पर्यावरणातील हवेचे, पाण्याचे, अन्नाचे प्रदुषण समजून घेऊन त्यावर वेळीच उपाययोजना करायला हवी, पर्यायाने पर्यावरणाचे वैश्विक भान हवे हे भान वेळीच न आल्यास मानवी समाजाला याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगांवकर यांनी केले.
          मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथोत्सव-2014 च्या दुस-या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या दुस-या सत्रातील पर्यावरणाचे वैश्विक भान या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगीराज वाघमारे उपस्थित होते.
        देशात 65 टक्के इतकी जैवविविधता असतानाही पर्यावरणासारखा प्रश्न गंभीर होतो आहे. त्याचबरोबर पाण्यासारखा स्फोटक विषय संयमाने हाताळण्याची गरज आहे. पर्यावरणावरील प्रश्नावर जागरुकता निर्माण करण्यासाठी साहित्यिकांनी यावर प्रकाश टाकणे गरजेचे असल्याचे सांगून देऊळगांवकर यांनी तिबेट मधून वाहणा-या नद्यांवर चीनने विविध धरणे बांधावयास घेतली आहेत या प्रश्नाकडे आंतरराष्ट्रीय दृष्टीकोनातून गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना श्री. वाघमारे म्हणाले की, निसर्गावर मानवी समुहाचे अतिक्रमण नको, मानवाला विकास हवा आहे, तत्पुर्वी पर्यावरणाचा व्यापक विचार होणे गरजेचे आहे. राज्यातील सर्व नद्यांचे पाणी दुषीत असल्याचेही ते म्हणाले.  यावेळी श्री. देऊळगांवकर यांनी प्रेक्षकांच्या पर्यावरणाबद्दलच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी गोविंद अहंकारी तर आभार प्रदर्शन फारुक बागवान यांनी केले. या कार्यक्रमासाठी अनेक ग्रंथप्रेमी, पर्यावरणवादी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top