उस्मानाबाद -: राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावतीने उस्मानाबाद येथे दि. 4 ते 6 फेब्रुवारी या कालावधीत ग्रंथोत्सव-2014 या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
    ख्यातनाम ग्रामीण कथाकार व साहित्यिक प्रा. डॉ. भास्कर चंदनशिव आणि जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे यांच्या हस्ते दि. 4 रोजी सकाळी 10 वाजता या ग्रंथोत्सवाचे उदघाटन होणार आहे. मराठवाड्यासह राज्यभरातील ग्रंथविक्रेत्यांचा सहभाग, शासकीय प्रकाशनांची उपलब्धता आणि साहित्यविषयक उपक्रमांची रेलचेल हे या ग्रंथोत्सवाचे वैशिष्ट्य राहणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सांस्कृतिक सभागृह, आनंदनगर येथे हा ग्रंथोत्सव होणार आहे.
       मागील सलग दोन वर्ष उस्मानाबाद जिल्ह्यातील साहित्य रसिकांनी या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद दिला. हे या उपक्रमाचे तिसरे वर्ष असून राज्याच्या सांस्कृतिक धोरणानुसार या उपक्रमांचे आयोजन राज्यातील सर्व जिल्ह्यात करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी शहराच्या विविध शाळा-महाविद्यालयांतून निघणारी ग्रंथदिंडी, प्रसिद्ध कवी-गीतकार-चित्रपट अभिनेते किशोर कदम अर्थात कवी सौमित्र यांच्याशी दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम, प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व ख्यातनाम वकील रुचिर कुलकर्णी या जोडीशी मनमोकळ्या गप्पा, वैज्ञानिक जिज्ञासा जागविणारा कुतूहल विज्ञानाचे हा कार्यक्रम आणि जिल्ह्यातील मान्यवर कवींची बहारदार काव्यमैफील आणि विविध विषयांवरील पुस्तक खरेदी करण्याची ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणारी संधी हे याचे वैशिष्ट्य राहणार आहे.
       दि. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता शहरातील विविध भागातून ग्रंथफेरी काढण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता ग्रंथोत्सवाचे उदघाटन होणार असून या कार्यक्रमास औरंगाबाद विभागाचे माहिती संचालक राधाकृष्ण मुळी, मराठवाडा साहित्य परिषदेचे उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी ह.रा. डेंगळे आदींची उपस्थिती राहणार आहे.
       त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता सामाजिक भान जपणारे कवी-गीतकार-चित्रपट अभिनेते किशोर कदम यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. कवयित्री व पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले आणि कवी-पत्रकार रवींद्र केसकर हे त्यांच्याशी संवाद साधतील.
        दि. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता ‘कुतूहल विज्ञानाचे’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यांत उस्मानाबाद जिल्ह्यातील वटवाघळांवर संशोधन करणारे डॉ. महेश गायकवाड हे प्रात्यक्षिकांसह संवाद साधणार आहेत तर अणूऊर्जा-समज व गैरसमज याबाबत तारापूर अणूऊर्जा प्रकल्पातील संशोधक ए.पी.कुलकर्णी हे सखोल माहिती देणार आहेत.
      त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता अभिनेत्री मृणाल कुलकर्णी-रुचिर कुलकर्णी यांच्याशी मनमोकळ्या गप्पांचा ‘जोडी तुझी माझी’ हा कार्यक्रम होईल. पत्रकार महेश पोतदार आणि कवयित्री व गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे या जोडीशी संवाद साधणार आहेत.
     दि. 6 रोजी सायंकाळी 6 वाजता जिल्ह्यातील मान्यवर कवींची बहारदार  काव्यमैफील रंगणार आहे. यात माधव गरड, राजेंद्र अत्रे, बालाजी इंगळे, डी.के. शेख, देवीदास पाटील, प्रा. हनुमंत काळे, शेखर गिरी, युवराज नळे, पंडित कांबळे, सतीश मडके, भाग्यश्री वाघमारे, प्रमोद माने, डॉ. विजय परदेशी, शंकर कसबे, बालाजी पाटील, विजय गायकवाड हे कवी सहभागी होणार असून रवींद्र केसकर सूत्रसंचलन करणार आहेत.
जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने हा उपक्रम होत असून मराठवाडा साहित्य परिषद, उस्मानाबाद शाखा, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नगरवाचनालय, नगरपरिषद वाचनालय यांचे या आयोजनामध्ये सहकार्य लाभले आहे.
      या सर्व कार्यक्रमांना जिल्ह्यातील साहित्यरसिकांनी उपस्थित राहण्याचे तसेच तीनही दिवस सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरु राहणाऱ्या ग्रंथप्रदर्शनातील पुस्तक विक्रीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. 
 
Top