सोलापूर -: 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्वांनी मतदानाचा अधिकार बजावावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी केले.
      जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत शिवछत्रपती रंगभवन येथे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. याच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पोलीस आयुक्त प्रदीप रासकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेश प्रधान, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु एन.एन. मालदार, प्रांताधिकारी शहाजी पवार आणि  उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीपती मोरे उपस्थित होते.
       जिल्हाधिकारी डॉ. गेडाम म्हणाले की,  समानता असणारी लोकशाही भारतामध्ये आहे. सुप्रीम कोर्टाने मतदानाचा नकाराधिकार मतदारांना दिला आहे. संपूर्ण जिल्ह्यात मतदार पुर्ननिरीक्षणचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवुन 3.5 लाख दुबार व अस्तित्वात नसलेल्या मतदान पुर्ननिरक्षणाचा कार्यक्रम घेतला. मतदार नोंदणी अभियान व्यापक प्रमाणावर राबवले. जिल्ह्यातील 18 वर्ष पूर्ण झालेल्या ज्या मतदारांनी  मतदार यादीत नांवे नोंदवले नाहीत त्यांनी आपली नांवे मतदार यादीत नोंदवावीत. भारत निवडणूक आयोग कार्यक्षम म्हणून संपूर्ण जगात ओळखले जाते. त्यांच्या सुचनेनुसार संपूर्ण वर्षभर मतदार नोंदणीची प्रक्रिया चालु असते. तेव्हा 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्वांनी येत्या निवडणूकीच्या काळात मतदानाचा अधिकार बजवावा.
       पोलीस अधीक्षक राजेश प्रधान म्हणाले की, मतदारांना मतदार ओळखपत्र देऊन शासनाने मतदारांना मान दिला आहे. त्याचा वापर करुन आपण सर्वांनी मतदान करावयाचे आहे. भारतीय राज्य घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार वापरुन आजच्या युवावर्गाने भारताचे उज्वल भविष्य घडविले पाहिजे.
     पोलीस आयुक्त प्रदीप रासकर म्हणाले की, सगळयांनी आपले स्वत:चे मतदान ओळखपत्र घेऊन मतदार यादीमध्ये स्वत:चे नांव असल्याची खात्री करुन  सर्वांनी आपले अमुल्य मत देऊन मतदानाचा अधिकार बजावला तर लोकशाही बळकट होईल.
       तर कुलगुरु मालदार म्हणाले की, प्रत्येकाने स्वेच्छेने मतदार केले पाहिजे. कार्यक्रमात उपस्थितांना मतदानाविषयी शपथ देण्यात आली. प्रातिनिधीक स्वरुपात काही नवीन मतदारांना मतदार ओळखपत्र वाटप करण्यात आले. मतदार दिवसानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे वाटप करण्यात आली. कार्यक्रमाच्रे प्रास्ताविक मोरे यांनी केले.
 
Top